🛑राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द.- कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई.
🟥महिला, मुलींची छेडछाड करणाऱ्यांना दणका बसणार.
सुरक्षेसाठी पीएमपीच्या प्रमुख स्थानकांवर पोलीस पथक.
🟥‘आषाढी वारी’ला पुण्यातून ७०० ‘लालपरी’.- एकाच गावातील मोठ्या ग्रुपने बुकिंग केल्यास गाडी थेट गावात जाणार.
🟥राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द.- कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई.
मुंबई :- प्रतिनिधी.
राज्यामधील विविध २९५ शिक्षण संस्थांची मान्यता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) रद्द केली असून, यामध्ये बहुसंख्य डीएड शिक्षण संस्थांचा समावेश आहे. या संस्थांनी कामगिरी मूल्यांकन अहवाल (परफॉर्मन्स अप्रायजल रिपोर्ट) न दिल्याने आणि त्याबाबत पाठवण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिशीलाही कोणतेच उत्तर न दिल्याने परिषदेने ही कारवाई केली. आता शिक्षक शिक्षण कार्यक्रमात या संस्थांना प्रवेश घेण्याची परवानगी मिळणार नाही, असे आदेश जारी करण्यात आले आहे.
शैक्षणिक संस्थांकडून प्रतिवर्षी शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी मूल्यांकन अहवाल केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे दाखल करावा लागतो. मात्र २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात राज्यातील २९५ शिक्षण संस्थांनी हा कामगिरी अहवाल दाखल केलेला नाही. त्यामुळे एनसीटीईने अशा संस्थांना कारणे दाखवा नोटीस जारी करत त्यांना उत्तर देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. परंतु एकाही शिक्षण संस्थेने कारणे दाखवा नोटिसीला उत्तर दिले नाही; त्यामुळे या संस्थांची मान्यता रद्द केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचे अध्यक्ष शैलेश नारायण झाला यांनी दिली.
मान्यता रद्द झालेल्यांमध्ये विशेषतः बीएड, डीएड, एमएलएड अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शिक्षण संस्था आणि काही अल्पसंख्याक संस्थांचा समावेश आहे.
🟥महिला, मुलींची छेडछाड करणाऱ्यांना दणका बसणार.
सुरक्षेसाठी पीएमपीच्या प्रमुख स्थानकांवर पोलीस पथक.
पुणे :-प्रतिनिधी
बस प्रवासासह स्थानकांवर चोरी, महिला व मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर पुणेपोलिसांची आता करडी नजर राहणार आहे. त्यासाठी पुणे पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पोलिस पथकाचा फौजफाटा नेमण्यात आला आहे. यापुढे बस प्रवासात छेडछाड, अश्लील हावभाव करणारे आणि घाणेरडे मजकूर लिहणाऱ्या भामट्यांसह चोरट्यांना दणका बसणार आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे,पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील प्रवाशांकरिता सार्वजनिक बससेवा पुरविली जाते. पीएमपीकडून ३८१ मार्गावर दररोज २० हजार फेऱ्यांद्वारे प्रवासी सेवा दिली जाते. त्यामधून १० लाखांपेक्षा जास्त नागरिक प्रवास करतात.
दररोजच्या बस संचलनादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात काही गंभीर समस्यांच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अज्ञात व्यक्तींकडून प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी, छेडछाड, काही असामाजिक घटकांकडून बीआरटी बसस्थानकांमध्ये अश्लील मजकुरांचे लिखाण करणे, अशा घटना घडत आहेत. या अनुचित घटनांमुळे विशेषतः महिला प्रवासी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून, त्या संदर्भात प्रवाशांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी मुख्य बसस्थानकांवर तसेच गर्दीच्या प्रमुख मार्गांवर सकाळी व रात्रीच्या वेळेत पोलिस यंत्रणेमार्फत नियमित गस्त घालणे अत्यावश्यक असल्याबाबत पीएमपी अध्यक्षांनी पोलिस आयुक्तांना गस्त घालण्याबाबत पोलिस आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यानुसार पुणे पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह २६ जणांची नेमणूक करण्यात आली आहे.
🛑असा असेल पोलिसांचा फौजफाटा
⭕पोलीस निरीक्षक :- दोन
⭕सहाय्यक पोलीस निरीक्षक :-एक
⭕पोलीस उपनिरीक्षक :-एक
⭕पोलीस कर्मचारी :-२२

🟥‘आषाढी वारी’ला पुण्यातून ७०० ‘लालपरी’.- एकाच गावातील मोठ्या ग्रुपने बुकिंग केल्यास गाडी थेट गावात जाणार
पुणे :- प्रतिनिधी
आषाढी वारी’ला विठ्ठल दर्शनासाठी पुण्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या असते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने तयारी केली असून, वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, पुण्यातून सातशे बस पंढरपूरसाठी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
दरवर्षी राज्यातील अनेक वारकरी आणि भाविक पंढरपूरला जाण्यासाठी पुण्यात येतात. शिवाय पुणे जिल्हा आणि शहरातून जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठी असते. गेल्या काही वर्षापासून आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुणे विभागातील १४ आगारातून पंढरपूरसाठी एसटी गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ६ जुलै रोजी आषाढी यात्रा असल्यामुळे काही दिवस अगोदर गाड्या सोडण्यात येते. त्यासाठी एसटीच्या पुणे विभागाने एकूण सातशे बस सोडण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये ३५० बस या पुणे विभागाच्या आहेत. तर, इतर ३५० बस या मुंबई प्रदेश आणि विदर्भातून मागविण्यात आले आहे. त्यामुळे यंदा पंढरपुरला एसटी महामंडळाच्या बसने जाणाऱ्या वारकऱ्यांना एसटी बसची कमतरता भासणार नाही. गेल्या तीन-चार वर्षातील गाड्यांच्या तुलनेत यंदा एसटीकडून जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुणे जिल्ह्यातील सर्व १४ आगारासह स्वारगेट, शिवाजीनगर येथून धावणाऱ्या बसची संख्या जास्त असणार आहे.
🛑ग्रुपने बुक करा, एसटी गावात येईल
वारकऱ्यांसाठी परिवहन महामंडळाने ग्रुप बुकिंगची सुविधा देण्यात आली आहे. एकाच गावातील ४० जणांच्या समूहाने ग्रुप बुकिंग केल्यास त्यांच्या गावातून गाडी सोडण्यात येणार आहे. या लोकांना घेण्यासाठी एसटी गावात जाईल. शिवाय दर्शन झाल्यावर पंढरपूर तेथून पुन्हा त्यांच्या गावी सोडेल. यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधा एसटीने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.
🔴वारीसाठी असे आहे नियोजन.
⭕पुणे विभागातील धावणाऱ्या बस – ३५०
⭕बाहेरील विभागातून मागविलेल्या बस – ३५०
⭕एकूण पंढरपूला सोडण्यात येणारे बस – ७००
⭕गेल्या वर्षी आषाढीला सोडलेल्या बस – ५५८
🟣आषाढीला भाविकांची वाढती संख्या पाहता यंदा बसची संख्या वाढविण्यात आली आहे. पुणे विभागातून ७०० बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे भाविकांची सोय होणार आहे.
अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी पुणे विभाग
