आजरा कारखान्याची १५ नोव्हेंबर अखेरची ऊस बिले जमा.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे दि. १५/११/२०२३ अखेर गाळप झालेल्या ऊसाची बिले प्र.मे.टन रू.३१००/- प्रमाणे विनाकपात ऊस पुरवठा शेतक-यांच्या सेव्हींग खातेवरती जमा करण्यात आलेबाबतची माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक यांनी दिली.
हंगाम २०२३/२४ मध्ये करखान्याने ३.५० लाख मे.टन ऊस गाळपाचे उदिदष्ट ठेवले असुन त्याकरीता बीड व स्थानिक तोडणी वाहतुक यंत्रणा ऊस तोडणी करीता कार्यरत ठेवणेचे नियोजन केले आहे. कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणा-या संपुर्ण ऊसाची बिले रू.३१००/- प्र.मे.टन प्रमाणे विनाकपात एकरक्कमी तसेच तोडणी वाहतुकीची बिले देखील नियमितपणे आदा केली जाणार आहेत.
कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने गाळपासाठी आणणेचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे. ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठिकाणी यंत्रणा उपलब्ध करून कारखान्याकडे जास्तीत जास्त कार्यक्षेत्रातील ऊस आणुन ऊस उत्पादकांना दिलासा दिला जाणार आहे. कांही क्षेत्रामध्ये जंगली जनावरांचा त्रास होत आहे अशा ठिकाणी यंत्रणा देवून सदर ठिकाणचा ऊस काढणेचे नियोजन देखील कारखान्या मार्फत केले जात आहे. आज देखील कार्यक्षेत्रात शिल्लक असलेल्या ऊसाची माहिती घेवून तो वेळेत गाळपास आणणेचे नियोजन व्यवस्थापनाने केले आहे. तरी ऊस उत्पादकांनी आपण पिकविलेला संपुर्ण ऊस आपल्या कारखान्यास गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती यांनी केले. शेतक-यानी आपला ऊस खुदद् तोड करून दिल्यास कारखान्यामार्फत वाहन उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे शेतक-यांचे तोडीसाठी होणा-या अवास्तव खर्चात बचत होवून शेतक-यांचा फायदा होईल. त्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांनी खुदद् तोड करून कारखान्यास ऊस पाठवावा असेही आवाहन केले आहे. यावेळी कारखान्याचे विभाग प्रमुख व कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
