🟣कर्जमाफीसाठी राष्ट्रीयकृत बँकांची बैठक लावण्याची शिवसेना उबाठा गटाची मागणी . आजरा तहसीलदार यांना निवेदन
🟣” तुकोबा” या ग्रंथावर मंगळवारी आजऱ्यात चर्चासत्र ( डॉ. रणवीर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती.)
🟣कर्जमाफीसाठी राष्ट्रीयकृत बँकांची बैठक लावण्याची शिवसेना उबाठा गटाची मागणी . आजरा तहसीलदार यांना निवेदन.
आजरा – प्रतिनिधी.

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली असताना, राष्ट्रीयकृत बँकांनी वेळेत माहिती न पाठवल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत. ही बाब लक्षात घेऊन आजरा तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँक व्यवस्थापकांची तात्काळ बैठक घ्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आजरा तालुक्याच्या वतीने आजरा तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
१) महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे.
२) अनेक शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतलेले आहे.
३) कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती वेळेत शासनाकडे जाणे गरजेचे आहे.
४) परंतु काही बँका ती माहिती वेळेत व परिपूर्ण न पाठवल्यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत.
त्यामुळे या सर्व बँकांच्या बँक व्यवस्थापकांची एक बैठक तात्काळ आपल्या कार्यालयात लावावी. जेणेकरून तालुक्यातील शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाहीत, अशी नम्र विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, ता. प्रमुख युवराज पोवार, उपताप्रमुख संजय असावे, विभाग प्रमुख सुनील डोंगर सह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
🟣” तुकोबा” या ग्रंथावर मंगळवारी आजऱ्यात चर्चासत्र ( डॉ. रणवीर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती.)
आजरा – प्रतिनिधी.
ह.भ.प देवदत्त परूळेकर यांनी लिहिलेल्या आजच्या काळासाठी तुकोबा या ग्रंथावर मंगळवार दिनांक ११ रोजी आजरा येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन केले आहे. मुकुंददादा देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात प्रा. सुनील शिंत्रे व सुभाष विभुते हे सहभाग घेणार आहेत याबरोबरच ग्रंथाचे लेखक व दांडेकर मामा दिंडीचे दिंडी प्रमुख हभप देवदत्त परूळेकर तसेच प्रकाशक अजय कांडर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
वारकरी, महाविद्यालयीन मुले, अभ्यासक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी मंगळवारी जनता सहकारी बँकेच्या सभागृहात दुपारी ठीक १२.०० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री राम कृष्ण हरी वारकरी संप्रदायाचे संस्थेचे अध्यक्ष गौरव सुतार महाराज, गंगाराम येडगे यांनी केले आहे.
