अहमदनगर:-प्रतिनिधी.०६
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. जिल्हा रुग्णालयातील आयसीयू रुग्णालयात ही आग लागली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आयसीयू वॉर्डात ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी एकूण 20 रुग्ण उपचार घेत होते. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. यासोबतच रुग्णालयातील नर्सेस, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांना इतरत्र हलविण्यास सुरुवात केली.ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले आहेत.रुग्णालयातील आयसीयू वॉर्डाला लागलेल्या आगीत ती ते चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तर 13 ते 14 रुग्ण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळाचे फोटोज आणि व्हिडीओ समोर आले असून ते पाहून ही आग किती भीषण होती याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो.
ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची माहिती मिळू शकलेली नाहीये. आयसीयू वॉर्डात लागलेल्या या आगीने अवघ्या काही क्षणात संपूर्ण वॉर्डला आपल्या विळख्यात घेतले.आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत. तसेच मदत आणि बचावकार्यही मोठ्या वेगाने सुरू आहे. घटनास्थळी अहमदनगर महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम देखील दाखल झाली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप दाखल असून त्यांनीही घटनेची माहिती घेतली.ही आग कशामुळे लागली, तसेच रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले होते की नाही याबाबत चौकशी करण्यात यावी असंही संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे.
एप्रिल महिन्यात नाशिकमधील रुग्णालयात अग्नितांडव एप्रिल 2021 मध्ये नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत 22 रुग्णांचा मृत्यू राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते.
‘कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत.अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मृतांच्या नातेवाईकांनी केला होता आरोप रुग्णालयात मृत झालेल्या एका व्यक्तीच्या नातेवाईकाने प्रसार माध्यमांना सांगितलं होतं की, आमचा माणूस गेला आहे. काल ऑक्सिजन लेवल 84 होती आज सकाळी आम्हाला कॉल येतो आणि सांगतात तुमचा रुग्ण क्रिटिकल आहे वर रुग्णालयात जाऊन पाहिलं तर ऑक्सिजन नव्हता. ऑक्सिजन पुरवठाच नव्हता.त्यानंतर 5-10 मिनिटांत ऑक्सिजन लीक झाला. रुग्णालयात ऑक्सिजनच नव्हता आणि त्यानंतर टँक लीक झाला. रुग्णालयात ऑक्सिजनच नव्हता. मी संपूर्ण रुग्णालयात तपासले पण ऑक्सिजन कुठेच मला मिळाला नाही. वर डॉक्टरांना विचारले तर ते म्हणाले खाली जाऊन डॉक्टरांना विचारा मग खाली आलो तर ते म्हणाले वर डॉक्टरांना विचारा. नंतर लक्षात आलं की यांच्याकडे शून्य ऑक्सिजन होता. आज जे रुग्ण दगावले आहेत याची जबाबदारी कोण घेणार?
