ज्योतिप्रसाद सावंत (कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी)
आर्थिक अडचणीमुळे बंद असणारे दौलत व आजरा असे दोन कारखाने पुन्हा डौलाने सुरु झाले असताना आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखाना मात्र सुवर्णमहोत्सवी वर्षात गळीताच्या दृष्टीने शांतच आहे. आजअखेर कारखाना सुरु करण्याबाबत केवळ चर्चाच झाली. प्रत्यक्षात मात्र म्हणावे तसे प्रयत्न न झाल्याने यावर्षी ‘गोड साखर’ कडूच रहाणार आहे.
‘गोडसाखर ‘हे गडहिंग्लज उपविभागातील प्रमूख विकासाचे केंद्र. संपूर्ण राज्यातच कारखानदारी अडचणीत आली असताना गडहिंग्लज कारखाना याला अपवाद राहीला नाही. ब्रिस्क कंपनीने कारखाना सोडल्यानंतर कारखाना चालविण्याच्या हालचाली वेळेत होणे गरजेचे होते. सुमारे ११० कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली कारखाना दबला गेला. अतिरीक्त कामगारभरती, जुन्या कामगारांची देणी, सभासदांचे ठेवीवरील व्याज,अंतर्गत सत्तासंघर्ष हि दुखणीही कायम आहेतच .
सहा महिन्यापूर्वी कारखाना संचालक मंडळाने ब्रिस्ककडून ताब्यात घेवूनही आजतागायत केवळ चर्चाच सुरु रहिली.सुवर्णमहोत्सवी वर्षात कारखाना बंद रहाणे निश्चतिच भूषणावह नाही. राजकीय हेतूने काही मंडळी आता कारखाना सुरु करावा अशी भूमिका घेऊन स्वतः नामानिराळे रहाण्याचा प्रयत्न करू लागली आहेत. राज्यातील प्रमुख राजकीय कारभा-यांची भेट घेवून कारखाना आता सुरुच होणार असे वातावरण तयार केले गेले.प्रत्यक्षात मात्र नेमके उलटेच घडत गेले. एकीकडे इतर कारखान्यांमधून साखर पडू लागली असताना ‘ गोड साखरेची’ यंत्रे थंडावली आहेत.
ज्या ताकदीने ‘ब्रिस्क’ला बाजूला करण्याच्या हालचाली झाल्या तीच ताकद जर तातडीने कारखाना सुरु करण्याच्या कामी लागली असती तर आज कारखाना सुरु होवून ऊस उत्पादक, सभासद, कामगार व कारखान्यावर अवलंबून असणा-या अनेकांची दिवाळी ख-या अर्थाने ‘गोड’ झाली असती.
यावर्षीच्या गळीताचा प्रश्न निकालात निघाला आहे. किमान पुढील वर्षीतरी गळीत हंगाम होईल यादृष्टीने आतापासूनच हालचाली करण्याची गरज आहे.
