आजरा. प्रतिनिधी.
शिवाजीराव सावंत हे रुबाबदार व्यक्तिमत्व होते आजऱ्यातील सव्वाशे वर्षांपूर्वीच्या श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराने वाचकांबरोबर साहित्यीकानाही बळ दिले. त्यामुळे शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही साहित्यकृती तयार झाली. त्याच पद्धतीचे अनेक साहित्यीकही आजऱ्याच्या परिसरात घडले. असे स्पष्ट प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रोफेसर डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. ते शिवाजी सावंत स्मृतिदिन व साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचन मंदिरचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचूळकर होते. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने संपूर्ण कार्यक्रम आभासी पद्धतीने घेण्यात आला. दीपप्रज्वलन व मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ.नंदकुमार मोरे व मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वागत व प्रास्ताविक आणि पुरस्कार विजेत्यांची नावे डॉ. अशोक बाचुळकर यांनी जाहीर केली. मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार नंदकिशोर भोळे यांच्या अनुबंध कादंबरीला, दाजी टोपले कथासंग्रह पुरस्कार प्रमोद कोयंडे यांच्या सोबतीण कथासंग्रहाला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लक्षणीय साहित्यकृती पुरस्कार डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांच्या टिपवंणी या साहित्यकृतीला तर बाल साहित्य पुरस्कार संयुक्ता कुलकर्णी यांच्या धमाल एकांकिकेला मिळाला आहे.
माणसाचे सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याचे काम कोरोनाने केले आहे. पण माणूस माणसांशिवाय राहू शकत नाही. अशावेळी ग्रंथालयातील पुस्तके साहित्यिकांची दुवा बनली. संकट काळात वाचकांना आधार दिला आहे. अन्यायाला तोंड देत जगणारे ८० टक्के लोक भारतात आहेत. या सर्वांचा नायक कर्ण आहे. व त्यांची कथा शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय मध्ये सांगितली आहे. त्यामुळे माणूस व जीवन समजून घेण्यासाठी सर्वांनी मृत्युंजय ही कादंबरी वाचावी असेही आवाहन डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह सदाशिव मोरे तर पाहुण्यांचा परिचय कार्यवाह विजय राजोपाध्ये यांनी करून दिला. आभासी पद्धतीने झालेल्या कार्यक्रमास प्रा. राजा शिरगुप्पे, अब्दुल नेसरीकर, वाचनालय संचालक सुभाष विभुते वामन सामंत, डॉ.अंजनी देशपांडे, संभाजी इंजल, विद्या हरेर, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर, निखील कळेकर यासह नागरिक उपस्थित होते. आभार उपाध्यक्षा गीता पोतदार यांनी मानले.