मुंबई :- प्रतिनिधी.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये येथील जाहीर कार्यक्रमात माजी सहकाऱ्यांना भावी सहकारी म्हणत केलेल्या वक्तव्याने तर्क वितर्कांना उधाण आले आहे.या विधानामुळे शिवसेना-भाजप पुन्हा युती होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे मंचावर उपस्थित असताना हे वक्तव केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, त्यांच्या शुभेच्छा… चांगली गोष्ट आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. मात्र, भाजपची भूमिका अगदी स्पष्ट आहे.आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाहीत.आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मनातली भावना बोलून दाखवली
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, हे जे काही अनैसर्गिक गठबंधन बनलं आहे ते फारकाळ चालू शकत नाही.मला असं वाटतं कदाचित मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आलं असेल की अशा प्रकारचे अनैसर्गिक गठबंधन करून महाराष्ट्राचं नुकसान होत आहे आणि म्हणून त्यांनी मनातली भावना बोलून दाखवली असंही ते म्हणाले.
मी काय मनकवडा नाही.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, मी काय मनकवडा नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय सांगू शकणार नाही.