स्मार्ट मीटर सक्तीविरोधात महावितरण कार्यालयावर शिवसेना उबाठाचा तिरडी मोर्चा निघणार.
आजरा : प्रतिनिधी.
आजरा तालुक्यात महावितरणकडून नागरिकांच्या जुन्या वीज मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, जुन्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविल्यानंतर नागरिकांना चौपट वीजबिल दिले जात असल्याचा आरोप करत शिवसेनेने या सक्तीला विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी आजरा महावितरण कार्यालयावर भव्य तिरडी मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाला महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

स्मार्ट मीटर बसविल्याशिवाय वीजबिल दुरुस्त करून देणार नसल्याचे उत्तर महावितरणकडून मिळत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या अन्यायाविरोधात हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
मोर्चाच्या वेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहिल्यास त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस महावितरण विभाग जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदनावर शिवसेना तालुका प्रमुख युवराज पोवार व उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील यांच्या सह पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




