🟣जागतिक हत्ती दिनानिमित्त आजरा वनविभागाचा जनजागृती कार्यक्रम – “हत्ती वाचवा, जंगल वाचवा” चा संदेश.
🟣तुकारामांचा विचार निरक्षर माणसांनी जिवंत ठेवला – डॉ रणधीर शिंदे,
आज-यात आजच्या काळासाठी तुकोबा या पुस्तकावर चर्चा
🟣जागतिक हत्ती दिनानिमित्त आजरा वनविभागाचा जनजागृती कार्यक्रम – “हत्ती वाचवा, जंगल वाचवा” चा संदेश.
आजरा – प्रतिनिधी दि. १२

जागतिक हत्ती दिनानिमित्त कोल्हापूर वनविभाग, वनपरिक्षेत्र आजरा (प्रा.) यांच्या वतीने सुलगाव रोपवाटिका, सुलगाव येथील परिक्षेत्र वनअधिकारी कार्यालयात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोल्हापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन सावंत*, परिक्षेत्र वनअधिकारी आजरा होते.
कार्यक्रमाचा उद्देश.-
हत्ती हा वन परिसंस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असून जैवविविधतेचे संवर्धन आणि जंगलातील नैसर्गिक समतोल राखण्यात त्याची भूमिका महत्त्वाची आहे. हत्तींचे संरक्षण, त्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवणे तसेच मानव-हत्ती सहअस्तित्वाबाबत जनजागृती करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
या कार्यक्रमास विजय पाटील मानद वन्यजीव रक्षक व शीतल पाटील परिक्षेत्र वनअधिकारी पाटणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दत्तात्रय पाटील वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण चंदगड हे प्रमुख वक्ते होते. सूत्रसंचालन कृष्णा डेळेकर वनपाल यांनी केले.
महत्त्वाचे मुद्दे.-
आजरा वनपरिक्षेत्रात सध्या गणेश’ आणि ‘राजा’ या दोन टस्कर हत्तींचा वावर आहे. त्यांच्या भ्रमंतीदरम्यान शेतपिकांचे नुकसान झाल्यास शासनाच्या नियमांनुसार नुकसानभरपाई दिली जाते.
सचिन सावंत म्हणाले, “मानव आणि हत्ती यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी हत्तींच्या नैसर्गिक वावराचा आदर करणे, त्यांच्या हालचालींमध्ये अडथळा न करणे आणि वनविभागाला वेळेवर माहिती देणे आवश्यक आहे. हत्तींचे संरक्षण करताना शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या हिताचेही रक्षण करणे हा वनविभागाचा सहअस्तित्वाचा दृष्टिकोन आहे.”
दत्तात्रय पाटील म्हणाले, “हत्ती हा केवळ वन्यप्राणी नसून जंगलाच्या परिसंस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. हत्तींसोबत सहजीवन स्वीकारणे आणि मानव-हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी वनविभाग व नागरिकांनी समन्वयाने काम करणे ही काळाची गरज आहे.”
साहित्य वाटप.-
कार्यक्रमात वन्यजीव बचाव पथक तसेच हत्ती हाकारा गटातील सदस्यांना वन्यप्राण्यांच्या सुरक्षित रेस्क्यूसाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामुळे बचावकार्य अधिक सुरक्षित व परिणामकारक होणार आहे.
कार्यक्रमास कृष्णा डेळेकर, संदीप शिंदे, कविता सावंत वनपाल यांच्यासह आजरा वनपरिक्षेत्रातील वनरक्षक, वनसेवक, वन्यजीव बचाव पथक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी “हत्ती वाचवा, जंगल वाचवा आणि निसर्गाचा समतोल जपा” तसेच “हत्तींसोबत सहजीवन स्वीकारूया, मानव-हत्ती संघर्ष कमी करूया” हा संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
🟣तुकारामांचा विचार निरक्षर माणसांनी जिवंत ठेवला – डॉ रणधीर शिंदे, आज-यात आजच्या काळासाठी तुकोबा या पुस्तकावर चर्चा
आजरा :- प्रतिनिधी.

सध्या अनेक महाराजांचा सुळसुळाट होत आहे. वारक-यांचा झेंडाही बदलत आहे.परंतु तुकारामांचा विचार खेड्यातील माणसांनी, निरक्षरांनी जिवंत ठेवला असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा डॉ रणधीर शिंदे यांनी केले. येथील जनता बँकेच्या सभागृहात राम कृष्ण हरी संस्थेच्या वतीने हभप देवदत्त परूळेकर लिखित आजच्या काळासाठी तुकोबा या पुस्तकावर आयोजित चर्चा सत्रात ते बोलत होते. जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई अध्यक्षस्थानी होते. डॉ शिंदे म्हणाले, ब्रिटिश अभ्यासकांनी तुकारामांच्यावर विवेचन केले. त्यांच्या जागतिक प्रेरणा कथा आहेत. तरूणांना विचार परिवर्तनाला उभं करण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांनी मूल्य देण्याची किमया केली आहे. पुस्तकात स्वतःशी बोलण्याचा, मनशांती करण्याचा उल्लेख केला आहे. आधुनिक समाज नकली जाहिरातबाजी, अहंकाराचा आहे. माणूसकी जपण्यासाठी तुकारामाचे अभंग आहेत.ते बळ देणारे आहेत. पुस्तकाचे लेखक हभप परूळेकर म्हणाले, जो माणूस भेदाभेद करतो तो वारकरी संप्रदायाच्या विचाराचा नाही. संतांचा विचार आपण सोडत असल्याने प्रश्न निर्माण होत आहेत. व्यवसाय करणाऱ्या व शाळकरी मुलांनी पुस्तक वाचण्याची गरज आहे. तुकाराम हे औषध आहे. तो समजून घेतला तर समाजाचे आरोग्य सदृढ होईल. सुभाष विभुते म्हणाले,गीतेवर बंडखोरी करून प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली.गुलामगिरीच्या काळात तुकाराम महाराजांचा जन्म झाला. तुकारामांनी कोणतेही क्षेत्र सोडले नाही. समाजाच्या मनातील वास्तव तुकारामांनी मांडले.यावेळी प्रा सुनील शिंत्रे, कवी अजय कांडर यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी जि. प सदस्य सुधीर देसाई,काँ.संपत देसाई, युवराज पोवार, रणजीत देसाई,गौरव सुतार, पांडुरंग जोशीलकर, गंगाराम येडगे, दीपाली गुरव, कल्पना जाधव, मंगल परुळेकर, शांताराम पाटील यांच्यासह इटे, खेडगे, मासोली, पोळगाव, एरंडोळ, सरंबळवाडी, शिरसिंगी, किणे, गाजरगाव, शेळप, मुंगूसवाडी, अवंडी येथील वारकरी उपस्थित होते. युवराज जाधव यांनी प्रास्ताविक केले. संजय घाटगे यांनी स्वागत केले.काशिनाथ मोरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश मोरूसकर यांनी आभार मानले.
