मलिग्रे–सिरसंगी सुपर रस्त्याला वन विभागाच्या हद्दीत चिखलाचा अडथळा.- वाहनधारक त्रस्त
आजरा : प्रतिनिधी.
मलिग्रे व सिरसंगी गावांच्या सीमेवरील चाळोबा डोंगराच्या पायथ्याशी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे ३.५ किलोमीटरचा डांबरी रस्ता पूर्ण झाला आहे. या रस्त्यामुळे दोन्ही गावांतील नागरिक व शेतकऱ्यांची तब्बल २५ वर्षांची मागणी पूर्ण झाली. मात्र, वन विभागाच्या हद्दीतील अवघ्या ८० मीटरच्या भागात चिखल व दलदल झाल्याने या मार्गावरील वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मलिग्रे–कागिनवाडी मार्गाला जोडणारा हा नवीन रस्ता सुरू झाल्यापासून गडहिंग्लजकडे जाणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा पर्यायी मार्ग ठरला आहे. गडहिंग्लज–नेसरी रस्त्याचे काम सुरू असल्याने तसेच भडगाव नदी पुलाच्या समस्येमुळे या मार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे.
सध्या मुसळधार पावसामुळे वन विभागाच्या सिरसंगीकडील भागात चिखल निर्माण झाला असून, विशेषतः लहान वाहने रस्त्यात रुतत आहेत. अवघ्या दहा फूट चिखलामुळे वाहनचालकांना तब्बल दहा किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे.
रस्त्यावर दिशादर्शक फलक, दोन्ही बाजूंना पांढरे पट्टे आणि रेडियम बसविल्यामुळे हा मार्ग आकर्षक व सुरक्षित झाला आहे. मात्र, वन विभागाच्या ८० मीटर रस्त्याला मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव नागपूरपर्यंत पाठविण्यात आला असून तो अद्याप प्रलंबित आहे.
सिरसंगी येथील गोठणदेव ‘क’ वर्ग पर्यटनस्थळावरील दोन एकरांतील वडाचे झाड पाहण्यासाठीही या मार्गावर पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर मंजुरी द्यावी किंवा शासनाने तात्पुरते खडीकरण करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिक, शेतकरी तसेच वाहनधारकांकडून होत आहे.




