“नागरिकांचा आमच्यावर विश्वास आहे, म्हणूनच त्यांनी सत्तेत बसवले” – ( काही विरोधक नगरपंचायत ची बदनामी करत आहेत. नगराध्यक्ष अशोक चराटी.)
आजरा – प्रतिनिधी.
आजरा नगरपंचायतीच्या विकासकामांना मंजुरी मिळण्यास उशीर होत आहे. सर्व विकासकामांचे ठराव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत. पण काही विरोधक आजरा नगरपंचायतीची बदनामी करत आहेत, ती थांबवावी आणि अधिकाऱ्यांकडून चांगली कामे करून घ्यावीत. याबत नगराध्यक्ष अशोक चराटी आणि नगरसेवक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
नगराध्यक्ष अशोक चराटी बोलताना म्हणाले, “आजरा शहरातील नागरिकांनी विश्वासाने आम्हाला सत्ता दिली आहे. काही विरोधक नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करत आहेत. तर दुसरीकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांना दादागिरी करत आहेत. आपल्याला कोणते निवेदन द्यायचे असेल तर ते नगराध्यक्षांकडे द्यावे. अधिकाऱ्यांना दमदाटी करू नये. ‘बघून घेतो, दाखवतो’ ही भूमिका बंद करावी. अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करून आपली कामे करून घ्यावीत.”
“रस्ते आणि पाण्याचा विषय जवळपास मार्गी लागला आहे. आरोग्याच्या गंभीर प्रश्नाबत टेंडर झाल्याशिवाय कामे होऊ शकत नाहीत. चर्चे गल्ली येथील विहिरीची स्वच्छता करून पाणी उपसा केला आहे. तसेच ती विहीर निर्जंतुक करण्यात आली आहे. घंटागाडीचे टेंडर निघाल्याशिवाय कचरा उचलण्याचे कामकाज व्यवस्थित होणार नाही. आजरा शहरातील सर्व विकासकामे करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी आहे. हळूहळू सर्व कामे पूर्ण होतील. सर्व प्रभागांतील विकासकामे पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.”
“परंतु काही विरोधक स्टंटबाजी करून नगरपंचायतीची बदनामी करत आहेत. आमचे सर्व नगरसेवक आजरा शहराच्या विकासासाठी एकनिष्ठ आहेत,” असेही ते म्हणाले.
यावेळी नगरसेवक अनिकेत चराटी, परेश पोतदार,तसेच संजय चव्हाण, महेश खेडेकर, अनिरुद्ध केसरकर, आरिफ खेडेकर, अश्विन डोंगरे, समीर चांद आदी उपस्थित होते.




