🟣घरकुल योजनेतील घोटाळे होणार बंद.- आता लाभार्थ्यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या मदतीने होणार पडताळणी.- केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
🟣शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात संपन्न.- राजमाता जिजाऊ फाउंडेशन संचलित श्री छत्रपती युवा ग्रुप उत्तूर.
🛑घरकुल योजनेतील घोटाळे होणार बंद.- आता लाभार्थ्यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या मदतीने होणार पडताळणी.- केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
नवी दिल्लीः- वृत्तसंस्था
प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता या योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या मदतीने पडताळणी केली जाणार आहे. एआयच्या माध्यमातून सत्यापन पूर्ण झाल्यानंतरच अंतिम पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याने बनावट अर्जदार आणि फसवणुकीच्या प्रकारांना मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ग्रामीण विकास विभागाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सुरू असलेल्या ‘आवास प्लस 2024’ सर्वेक्षणासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या सर्वेक्षणाद्वारे देशभरातील पात्र कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली असून आता त्या माहितीची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपासणी केली जाणार आहे.
सरकारच्या नव्या धोरणानुसार, लाभार्थ्यांनी दिलेली माहिती, कुटुंबाची आर्थिक स्थिती, सरकारी नोंदी आणि इतर तपशील यांची एआय प्रणालीद्वारे तपासणी केली जाईल. यानंतरच पात्रतेची अंतिम खात्री होणार आहे. त्यामुळे अपात्र व्यक्तींना योजनेचा लाभ घेणे कठीण होणार असून खऱ्या गरजूंपर्यंत सरकारी मदत पोहोचण्यास मदत मिळेल. याआधी सर्वेक्षणादरम्यान अपात्र कुटुंबांचे स्व-सत्यापन, त्यानंतर अधिकाऱ्यांमार्फत तपासणी आणि चुकीच्या नोंदी वगळण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या सर्व टप्प्यांनंतर आता एआय-आधारित अंतिम पडताळणी केली जाणार आहे.
आवास प्लस 2024 अंतर्गत मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण करण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, एका जिल्ह्यातच 1 लाख 12 हजार 849 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी 86 हजार 651 अर्जाची माहिती योग्य आढळली, तर 26 हजार 198 नोंदी संशयास्पद असल्याचे समोर आले आहे. तसेच हजारो नोंदी हटविण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून संशयास्पद माहितीची स्वतंत्र पडताळणी सुरू आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून सत्यापनकर्त्यांकडून माहितीची तपासणी केली जात असून त्यानंतरच अंतिम पात्रता यादी तयार होणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभांचे आयोजन करून 30 जूनपर्यंत स्थायी पात्रता यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एआयद्वारे पडताळणी झाल्यानंतर ग्रामस्तरावरील प्राधान्यक्रम यादी स्वयंचलित पद्धतीने तयार केली जाईल.
याशिवाय लाभार्थ्यांची माहिती जॉब कार्ड आणि इतर शासकीय नोंदींशी जोडून पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीने अनेक योजनांचा लाभ घेतला आहे का किंवा चुकीची माहिती दिली आहे का, हेही सहजपणे समोर येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतील पारदर्शकता वाढण्याची अपेक्षा आहे. अनेकदा अपात्र व्यक्तींना घरकुलाचा लाभमिळाल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. मात्र आता एआयतंत्रज्ञानामुळे अशा प्रकारांना आळा बसणार असून पात्र आणि गरजू कुटुंबांनाच घरकुलाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. त्यामुळे आगामी काळात पीएम आवास योजनेच्या लाभार्थी निवड प्रक्रियेत मोठी पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण होण्याची शक्यता आहे.
🛑शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात संपन्न.- राजमाता जिजाऊ फाउंडेशन संचलित श्री छत्रपती युवा ग्रुप उत्तूर.
आजरा.- प्रतिनिधी.

राजमाता जिजाऊ फाउंडेशन संचलित श्री छत्रपती युवा ग्रुप उत्तूर ६ जून शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला यावेळी ग्रुपचे २१ मावळे सहभागी होते. सालाबाद प्रमाणे याही वर्षी राज्याभिषेक दिना निमित्त गडकिल्ले मोहीम संपन्न झाली यामध्ये दि ४ रोजी किल्ले तुंग किल्ले तिकोना पालीचा गणपती दि ५ रोजी किल्ले सुधागड व दि ६ रोजी किल्ले रायगड दि ७ रोजी-किल्ले प्रतापगड या गडांचा मोहिमेमध्ये समावेश होता.




