देशी वाण संवर्धनासाठी आजऱ्यात शेतकरी मेळावा संपन्न
( शुद्ध घनसाळ बियाणे निर्मितीला जिल्हा परिषदेचे प्रोत्साहन.- भेसळ रोखण्यासाठी क्यूआर कोडची योजना.)
आजरा, प्रतिनिधी. दि.८
देशी वाणांच्या संवर्धनाच्या हेतूने व शुद्ध बियाणे निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने आजरा येथे उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा संपन्न झाला.
सोमवार दि.८ जून रोजी कै. मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत दालनात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत होत्या. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा विकास कृषी अधिकारी राजेंद्र माने यांनी केले.
तालुक्यातील घनसाळ उत्पादक शेतकऱ्यांना या मेळाव्यात विविध तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शास्त्रज्ञ शैलेंद्र कुंभार, जि. प. उपाध्यक्ष तानाजी पाटील, महिला व बालकल्याण समिती सदस्य विद्याताई पाटील, जि. प. सदस्य सुधीर देसाई, संभाजी सावंत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

चौकट : भेसळ रोखण्यासाठी नवा उपाय
आजरा घनसाळ तांदळाला देशभरातून मागणी वाढत असताना बाजारात भेसळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही भेसळ थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला भात एकाच ठिकाणी विक्रीसाठी ठेवावा. तसेच तांदळाच्या पाकिटावर क्यूआर कोड व मोबाईल नंबर द्यावा, जेणेकरून ग्राहक थेट उत्पादक शेतकऱ्याशी संपर्क साधू शकेल, असे आवाहन मान्यवरांनी केले. ‘आजरा घनसाळ’ हा ब्रँड टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे व सेंद्रिय शेतीकडे वळावे, असेही यावेळी सांगण्यात आले.

या मेळाव्याला मुख्य कार्यकारी अधिकारी, पं. स. सभापती सौ. जयश्री गाडे, उपसभापती सौ. यशोदा पोवार, पं. स. सदस्य विकास चोथे, समीर पारदे, कृषी अधिकारी दिनेश शेटे, जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी मानले.




