नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.- राज्यात उष्णता वाढणार
मुंबई :- प्रतिनिधी
राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच तापमानात झपाट्याने वाढ होत असून अनेक ठिकाणी पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव आणि कोल्हापूरसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उकाडा वाढू लागला आहे. विशेषतः सोलापूर येथे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचल्याने नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. अशातच पुढचे २- ३ दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण आणि विदर्भात प्रचंड उकाडा वाढणार आहे.
नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आर्द्रता जास्त असून उष्णतेचा अनुभव अधिक तीव्र जाणवेल. राज्यात उष्णतेचा तीव्र चटका जाणवण्यामागे हवामानातील बदल आणि वाढती आर्द्रता मुख्य कारण आहेत. कोकणातील जिल्ह्यांमध्ये आर्द्रतेमुळे उकाडा अधिक तीव्र अनुभवास येईल, तर विदर्भात 39-41 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याचे धोके निर्माण होऊ शकतात. हवामान खात्याच्या सल्ल्यानुसार, नागरिकांनी उन्हाळ्याच्या काळात विशेष खबरदारी घ्यावी. शक्यतो भर दुपारी म्हणजेच १ ते ४ या दरम्यान शक्य असल्यास घरातच थांबावे. उन्हात जाणे टाळावे. उन्हात जायचे असल्यास डोक्याला पुर्णपणे सुती कपडा गुंडाळून घ्यावा. गॉगल घालावा. या दिवसांत तंग, गडद रंगाचे, जाडसर कपडे घालू नका. अंगातले कपडे सुती, सैलसर असावे. जेणेकरून उष्णतेचा जास्त त्रास होणार नाही.
कडक उन्हातून घरात आल्यावर लगेच थंडगार एसीमध्ये जाऊन बसू नका. कारण शरीराला बदलत्या तापमानासोबत जुळवून घ्यायला वेळ लागतो आणि तेवढा वेळ त्याला दिलाच पाहिजे. पाणी भरपूर प्रमाणात प्या.
घराबाहेर पडताना पाण्याची बाटली कायम सोबत असू द्या. त्यासोबतच नारळपाणी, ताक, लिंबूपाणी, कोकम सरबत, कैरीचे पन्हे, बडिशेपाचं सरबत यासारखी पेयं दिवसभरात अधून मधून प्या. यामुळेही डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. कच्चा कांदा खा. त्यामुळे उष्णतेचा त्रास होत नाही. तसेच खडीसाखर, काकडी, टरबूज, खरबूज असे पदार्थही खा. यामुळे शरीरातली पाणी पातळी स्थिर राहण्यास मदत होते.
