तहसीलदारांन मागितली ५० हजाराची लाच. – लाचेची मागणी केल्याचे पुरावे एसीबीच्या तपासात निष्पन्न.
बीड :- प्रतिनिधी.
बीड जिल्ह्यातील परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. एका तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या प्रकरणातील काम करून देण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सुरुवातीला 50 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तक्रारदाराच्या विनंतीनंतर 20 हजार रुपयांत तडजोड झाल्याचे समोर आले आहे. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर एसीबीने सापळा रचून कारवाई करण्याचे ठरवले. दरम्यान, कारवाईची कुणकुण लागल्याने तहसीलदार मुंडे यांनी प्रत्यक्षात लाच रक्कम स्वीकारली नाही.
तरी देखील तक्रारदाराकडून लाचेची मागणी केल्याचे पुरावे एसीबीच्या तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईनंतर परळी तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली असून तहसीलदारासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्येही संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. अनेक नागरिकांनी एसीबीच्या कारवाईचे स्वागत करत, प्रशासनातील भ्रष्टाचारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, एसीबीचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, यामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर यापूर्वीही अशा स्वरूपाच्या तक्रारी होत्या का, याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणामुळे परळी तालुक्यातील प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
