राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला..
मुंबईः- प्रतिनिधी.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला आजहे. त्यांच्या या ऐतिहासिक नियुक्तीमुळे राज्याच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला असून, महिला नेतृत्वाच्या दृष्टीने हा क्षण अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्याने आजचा दिवस राज्याच्या राजकारणात अत्यंत ऐतिहासिक आणि भावूक ठरला.
सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या नियुक्तीमुळे महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले आणि त्यानंतर चैत्यभूमीवर जावून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून त्या मंत्रालयात दाखल झाल्या. यानंतर त्यांनी सर्व खात्यांचा पदभार स्वीकारला. सुनेत्रा पवार या राज्याच्या समाजकारणात अनुभवी आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. सामाजिक प्रश्नांबाबत त्यांची संवेदनशील भूमिका, महिलांच्या प्रश्नांवरचे आणि महिलांच्या बाबतच्या विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे त्या कायमच चर्चेत राहिल्या आहेत.
त्यांच्या या नियुक्तीमुळे निर्णयप्रक्रियेत महिलांचे प्रतिनिधित्व अधिक बळकट होणार असल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त केलं जातंय. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेक नेत्यांनी उपमुख्यमंत्रिपद भूषवले असले तरी प्रथमच एखाद्या महिलेला ही जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे ही नियुक्ती केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची मानली जात आहे. राज्यातील महिला, युवती आणि नव्या पिढीतील नेतृत्वासाठी हा क्षण प्रेरणादायी ठरणार आहे. कार्यभार स्वीकारताना सुनेत्रा पवार यांनी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत समन्वयाने काम करण्यावर भर दिला. सुनेत्रा पवार यांचा हा राजकीय प्रवास राज्यातील महिला नेतृत्वासाठी नवा आदर्श ठरणार असून, महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.
