सरकारच्या संच मान्यतेच्या धोरणा विरोधात आंदोलन करणार..( १० जानेवारीला आजऱ्यात व्यापक मेळावा.)
आजरा.- प्रतिनिधी.
महाराष्ट्र शासनाच्या १० मार्च २०२५ च्या शासन निर्णयामुळे झालेल्या संच मान्यतेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सहा ते आठवी वर्गातील वीस पेक्षा कमी पट संख्या असलेल्या २३४ शाळामधील वरिष्ठ वर्गाचे शिक्षक कमी होणार असल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. बहुजन समाजातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणातून हद्दपार करण्याचे हे धोरण असून याविरोधात तीव्र लढा उभारला जाणार असल्याचे शाळा वाचवा आंदोलनाचे निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी कॉम्रेड संजय तर्डेकर, प्रकाश मोरुस्कर, सुरेश शिंगटे उपस्थित होते.
कॉम्रेड संपत देसाई पुढे म्हणाले की २०२३ साली राज्यसरकारने २० पटाखालील शाळा समायोजन करण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात आम्ही आजरा ते सावंतवाडी असा लाँगमार्च काढला होता. तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एकही शाळा बंद होणार नाही असे लेखी पत्र दिले. त्यानंतर हा निर्णय थांबवला गेला. आता पुन्हा नवीन निर्णय करून सरकार शिक्षणाचे खाजगीकरण करू पाहत आहे.
संजय तर्डेकर म्हणाले की बहुजन समाजातील मुलांना शिक्षणातून हद्दपार करण्याचे हे धोरण आहे. आम्ही हा सरकारचा डाव उधळून लावू. सरकार शिक्षक संख्या कमी करून गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित ठेवत आहे. त्याला आम्ही तीव्र विरोध करू.
यावेळी प्रकाश मोरुस्कर, सुरेश शिंगटे उपस्थित होते. शनिवारी दि १० जानेवारी २०२५ रोजी, ठीक १२.०० वाजता आनंदराव नंदवडेकर शिक्षक पतसंस्था आंबोली रोड आजरा येथे आजरा, चंदगड, गडहिंग्लज आणि भुदरगड तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समित्यांचा व्यापक मेळावा आयोजित केला असून या मेळाव्याला सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
