उतूरच्या महिला आता कबड्डीच्या मैदानात.- राजश्री शाहू महाराज कला अकादमीने केले प्रोत्साहित.
आजरा.- प्रतिनिधी.
उत्तूर (ता.आजरा ) येथील महिला पारंपरिक सामाजिक बंधने तोडून कबड्डीच्या मैदानात बाजी मारत आहेत. कब्बडी खेळणा-या या महिलांनी कौटुंबिक आणि सामाजिक अडथळ्यांवर मात करून आत्मसन्मान आणि शारीरिक क्षमता सिद्ध केली आहे. हा खेळ त्यांच्यासाठी सक्षमीकरणाचे साधन बनला आहे. राजश्री शाहू महाराज कला अकादमीच्या कार्यकर्त्या निता घोरपडे यांनी उत्तूर गावातील तळागळातील महिलाना कबड्डी खेळण्यासाठी प्रोत्साहीत केले. त्यांचा एक संघ तयार केला. या महिलांनी येथील कन्या विद्यामंदिरच्या पटांगणावर रोज रात्री एक तास सराव केला.यामुळे या महिलांचा शारीरिक तंदुरुस्तीबरोबर आत्मविश्वासही वाढला. सोनारवाडी (ता. चंदगड) येथे महिलांच्या कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नामांकित संघ यामध्ये सहभागी झाले होते.

या संघातील तगड्या महिला पाहून आपला यांचेसमोर टिकाव लागणार नाही अशी भावना तयार झाली. मात्र निता घोरपडे यांनी सर्वाना धिर देवून मैदानात उतरवले. या नवख्या महिलांचा खेळ पाहून प्रेक्षकांनी दाद दिली. या खेळात उत्तूरच्या महीला संघाला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. संघातील सर्व खेळाडूंचा सन्मान पत्र व मेडेल देऊन सन्मानित करण्यात आले. या संघात अश्विनी कृष्णा शिंदे, सुनीता दशरथ आरेकर, ऋतुजा रजिंद्र चव्हाण, शीतल बाळकृष्ण भाईगडे, वैशाली राजेंद्र बामणे,मनिषा गजानन कुंभार,आयेशा विश्वास माने.स्वाती बाहुबली हजारे.सवीता गणपती चव्हाण यांचा समावेश आहे तेजस्वीनी राजेंद्र बामणे यांनी मार्गदर्शक (कोच) म्हणून काम पाहिले.
