बोलीभाषांचे संवर्धन ही काळाची गरज – प्रा. दिलीप संकपाळ.
आजरा – प्रतिनिधी.
जागतिकीकरणामुळे अनेक भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर असताना बोलीभाषांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. असे मत प्रा. दिलीप संकपाळ यांनी व्यक्त केले.
आजरा महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने अभिजात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने प्रा. संकपाळ बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सादळे होते.
प्रा. संकपाळ पुढे म्हणाले की, गेल्यावर्षी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केल्याबद्दल सर्वत्र अभिजात मराठी भाषा दिन साजरा करण्यात येत आहे. अशावेळी मराठी भाषेवरील इतर भाषांचे आक्रमण थोपवायचे असेल तर मराठीच्या बोलीभाषांचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. बोलीभाषा याच प्रमाणभाषांचा पाया असतात. बोलीभाषा मूळ भाषेला समृद्ध करत असतात, मूळ भाषेतील शब्दसंग्रह वाढवत असतात. त्यामुळे बोलीभाषांची अभ्यास केंद्रे सुरू होणे गरजेचे आहे.
मराठी विभागप्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. विनायक चव्हाण यांनी सूत्रसंचालन तर डॉ. आप्पा बुडके यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी प्रा. सुषमा पारकर, प्रा. सुवर्णा धामाणेकर, प्रा. वैशाली देसाई, प्रा. रत्नदीप पवार, प्रा. अनिल निर्मळे, प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील आदी उपस्थित होते.
