🟥आगामी निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार.- उद्योगमंत्री उदय सामंत
🟣उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आज ९ सप्टेंबर रोजी.
( एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय निश्चित. )
🟥आगामी निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार.- उद्योगमंत्री उदय सामंत
रत्नागिरी :- प्रतिनिधी

आगामी निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत, आम्हाला घसघशीत बहुमत मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला. प्रत्येक पक्षाने आपापल्या नेत्यांमार्फत आपली भूमिका मांडावी असे सांगत, प्रत्येक जागेवर महायुतीकडून तयारी सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. यासह, त्यांनी मराठा आरक्षण, शिंदे-फडणवीस यांच्यातील संबंध आणि विरोधकांवरील टीकेवरही भाष्य केले. मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना सामंत म्हणाले की, ‘मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.’ यासोबतच, मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांसाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील एका हॉर्डिंगवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना ना.सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील युती अभेद्य असल्याचं सांगितलं. ‘आमच्यात कोणताही श्रेयवाद नाही. ज्यांच्या पोटात पोटशूळ उठलाय, तेच असे गैरसमज पसरवत आहेत,’ असे ते म्हणाले. हे सांघिक काम असून, त्यात देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पाया पडत असतील तर त्यात गैर काही नाही, असे सांगून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
🟥मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलताना ना. सामंत यांनी त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले. त्यांच्या मागण्या मान्य करून मराठा समाजाला न्याय दिला आहे, असे ते म्हणाले. तर संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘त्यांच्या बोलण्याने निवडणुका जिंकल्या जात नाहीत आणि महाराष्ट्रातील जनता त्यांना फारशी किंमत देत नाही.’ रोहित पवार यांच्याबद्दलच्या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. हा प्रश्न जर शरद पवार यांनी विचारला असता, तर मी उत्तर दिलं असतं. रोहित पवार यांच्यावर मी का बोलू? असे म्हणत त्यांनी उत्तर देण्याचं टाळले.
🟣उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आज ९ सप्टेंबर रोजी.
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आज ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ५ या कालावधीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे खासदार मतदान करतील.
या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे.त्यांच्यासमोर इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांचं आव्हान आहे.
💥क्रॉस व्होटिंगचा धोका कोणाला?
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे मतदान करतात. त्यासाठी कोणताही व्हिप नसतो. खासदार त्यांच्या सदसदविवेकबुद्धीनुसार मतदान करु शकतात. पण बहुतांश खासदार त्यांच्या पक्षाच्या भूमिकेप्रमाणेच मतदान करतात. मात्र तरीही क्रॉस व्होटिंगची शक्यता असते. त्यामुळे अंतिम निकालाबद्दल अंदाज लावणं कठीण असतं.
🅾️जिंकण्यासाठी बहुमताचा आकडा काय?
सध्याच्या घडीला लोकसभेत ५४२ आणि राज्यसभेत २३९ खासदार आहेत. याचा अर्थ संसदेत सध्या ७८१ खासदार आहेत. याचा अर्थ जिंकण्यासाठी ३९१ खासदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती मतदानापासून दूर राहणार नाही. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत ७७० खासदार मतदान करु शकतात. याचा अर्थ एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना विजयासाठी ३८६ खासदारांची मतं मिळवावी लागतील.
🟥राधाकृष्णन यांचं पारडं जड, विजय निश्चित
दोन्ही सभागृहात मिळून भाजप प्रणित एनडीएकडे ४२५ खासदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसनं राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केला आहे. संसदेत त्यांचे ११ खासदार आहेत. याचा अर्थ एनडीएचं संख्याबळ ४३६ पर्यंत जातं. त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. नवीन पटनायक, चंद्रशेखर राव आणि जगन मोहन रेड्डी या ३ माजी मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका एनडीएच्या पथ्थ्यावर पडणार आहे.

लोकसभेत ७ अपक्ष खासदार आहेत. त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. आम आदमी पक्षाच्या स्वाती मालिवाल यांची भूमिका काय असणार, हेदेखील अस्पष्ट आहे. कारण त्या पक्षापासून दूर गेल्या आहेत. त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चाही मध्यंतरी सुरु होती. शिरोमणी अकाली दल आणि मिझोरममधील झेडपीएम यांचीही भूमिका स्पष्ट नाही. त्यांच्याकडे प्रत्येकी एक खासदार आहे.
🅾️विरोधकांचा मार्ग अवघड
इंडिया आघाडीचे उमेदवार असलेल्या सुदर्शन रेड्डी यांची वाट बिकट आहे. इंडिया आघाडीकडे ३२४ खासदार आहेत. एनडीए ४३६ आणि इंडिया आघाडी ३२४ अशी सध्याची स्थिती आहे. म्हणजे ११२ मतांचं अंतर आहे. सात अपक्ष, अकाली दल, झेडपीएम, मालिवाल यांच्या मतांची गोळाबेरीज करुनही सुदर्शन जादुई आकड्यापासून खूप दूर आहेत. त्यामुळे आता त्यांची मदार क्रॉस व्होटिंगवर असेल.
