🛑आंबेओहोळ पुनर्वसनाच्या बैठका म्हणजे लोकप्रतिनिधींचे वेळ काढू धोरण.- कॉ.शिवाजी गुरव.
🛑मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना आर्थिक सक्षम करण्यासाठी केडीसीसी बँक हिमालयासारखी पाठीशी..
( वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन.)
💥आंबेओहोळ पुनर्वसनाच्या बैठका म्हणजे लोकप्रतिनिधींचे वेळ काढू धोरण.- कॉ.शिवाजी गुरव.
आजरा.- प्रतिनिधी

आंबेओहोळ पुनर्वसनाच्या बैठका म्हणजे लोकप्रतिनिधींचे वेळ काढून धोरण आहे अशी माहिती कॉ.शिवाजी गुरव. यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. आंबेओहोळ हा धरणग्रस्तांचे पुनर्वसन रखडणारा महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प आहे. आंबेओहोळ धरणग्रस्तांची गेली २५ वर्ष कुचेष्ठा चालवली आहे प्रश्न गांभीर्याने न घेता लोक भेटण्यासाठी येतात म्हणून बैठका घ्यायच्या अधिकाऱ्यांचा आढावा ऐकून घ्यायचा प्रत्येक वेळी प्रश्न तेच चर्चा तीच मात्र प्रगती काहीच नाही. प्रत्यक्ष ज्यांचे पुनर्वसन बाकी आहे त्यांच्याशी किंवा संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा न करता ज्यांना पुनर्वसनाचे प्रश्न माहीत नाहीत ते आपल्या पक्षाचे कार्यकर्ते बैठकीला बसून आज पर्यंत १०० पेक्षा जास्त बैठका घेतल्याचे सांगून पुन्हा पुन्हा बैठक घेणे म्हणजे वेळ काढू धोरण एवढेच होत आहे.
वास्तविक संकलन दुरुस्ती सारखे प्रश्न स्थानिक जिल्हा पातळीवर आहेत, काही शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या पण त्यांच्या सातबारावर चुकीच्या पद्धतीने बोजा चढवला आहे याला पुनर्वसन म्हणायचे का? करार होऊन २ ते ३ वर्षे पूर्ण झाली तरी देखील काही शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांना जमीनी मिळालेल्या आहेत. पण घर बांधणीचे भूखंड मिळाले नाहीत. जमीन संपादन करण्याचे बरेच प्रश्न शिल्लक असताना ना. हसन मुश्रीफ यांचे नेहमीचे आश्वासन ते म्हणजे “शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही”.
या अगोदरचे पेपरच्या बातमीचे कात्रण पाहिल्यास पूर्वीचे आश्वासन होतं ते म्हणजे जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत घळभरणी करणार नाही. सुरुवातीच्या काळात कै. बाबासाहेब कुपेकर देखील असेच म्हणत होते. मात्र गेली २५ वर्ष शेतकरी पुनर्वसनाची चातकाप्रमाणे वाट पाहतो, मात्र अधिकारी व लोकप्रतिनिधी बैठका घेऊन नुसता टाईमपास करत आहेत. असेच होत गेल्यास अजून दहा ते पंधरा वर्षे पुनर्वसन होईल असे वाटत नाही. मंत्री मुश्रीफ साहेबांनी लोकांची कुचेष्टा थांबवून गांभीर्याने घ्यावे व पुनर्वसन करावे. धरणग्रस्तांची एक पिढी मागे पडली आहे. अजून जास्त वेळ घेऊ नये असे वाटते. मतदारसंघ बदलण्याची ना. श्री. मुश्रीफ वाट पाहत आहेत. की काय अशी भावना प्रकल्पग्रस्तांची झाली आहे. कृपया सत्य मांडणी करत आहे वाईट वाटून घेऊ नये, धरणग्रस्तांचे पुनर्वसन लवकर करावे एवढीच अपेक्षा आहे. असे दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात
आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटना अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी म्हटले आहे.

🛑मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना आर्थिक सक्षम करण्यासाठी केडीसीसी बँक हिमालयासारखी पाठीशी.. ( वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन..
मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना उद्योगधंदा, व्यवसाय, स्वयंरोजगार व रोजगारासाठी कर्जपुरवठा…)
कागल.- प्रतिनिधी

केडीसीसी बँकेकडून कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे मराठा समाजातील बेरोजगार युवकांना उद्योगधंदे, व्यवसाय, स्वयंरोजगार व रोजगारासाठी हा अर्थपुरवठा केल्याचेही वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ ते म्हणाले. कागलमध्ये कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्जमंजुरी पत्रांच्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, मराठा समाजासह ओबीसी, कुणबी, मागास व भटक्या समाजाच्या बेरोजगार तरुणांनाही उद्योगधंदे व व्यवसायासाठी बँक कर्ज पुरवठा करीत आहे. शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत पिककर्ज बिनव्याजी देणारी देशातील ही पहिली व एकमेव बँक आहे असे सांगतानाच ते म्हणाले, शेतीची अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या साखर कारखान्यांच्या पाठीशीही बँक पहाडासारखी उभी आहे.

खालीलप्रमाणे कर्ज मंजूर झालेली लाभार्थी :-
संदेश महादेव पाटील – बिद्री, चैतन्य यशवंत पाटील – साके, कृष्णात तुकाराम रेपे- चौंडाळ, अरुणा रघुनाथ फराकटे – बोरवडे, मनीषा युवराज पाटील – सावर्डे बुद्रुक, उमाजी कृष्णात भोसले – पिराचीवाडी, बाबुराव पांडुरंग बोडके – वाळवे खुर्द, अशोक श्रीपती जाधव – व्हनुर
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, माजी नगराध्यक्ष नवल बोते, अस्लम मुजावर, चिमगावचे सरपंच दीपक आंगज, रणजीत मोरे, प्रकाश भिऊंगडे, आदीप्रमुख उपस्थित होते.
