🟥आधी कारने उडवले, नंतर केले सपासप वार.- अमरावतीत भर रस्त्यात पोलीस अधिकाऱ्याची हत्या.
🟥पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला.- स्फोटकांनी भरलेली कार सैन्याच्या ताफ्याला धडकली.
🟥उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार.- उत्तरकाशीमध्ये ढगफुटी.8 ते 10 कामगार बेपत्ता.- बचावकार्य सुरू
🟥आधी कारने उडवले, नंतर केले सपासप वार.- अमरावतीत भर रस्त्यात पोलीस अधिकाऱ्याची हत्या.
अमरावती -: प्रतिनिधी.
अमरावतीमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची हत्या करण्यात आली आहे. एका चारचाकी कारने दुचाकीस्वार पोलीस अधिकाऱ्याला उडवले. त्यानंतर त्यांच्या पोटावर, छातीवर धारदार शस्त्राने वार करून हल्लेखोर पसार झाले. मात्र काही तासांतच पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
अमरावती पोलीस आयुक्तालय अंतर्गत वलगाव पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादर कार्यरत होते. हल्ल्यानंतर त्यांना नजीकच्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादर हे दुचाकीवरून निघाले होते. मागून एका चारचाकीने त्यांना उडवले. ते दुचाकीवरून खाली पडताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर सपासप वार केले. त्यांच्या छातीवर, पोटावर वार करून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला होता.
त्यांच्यावरील हल्ल्याचे वृत्त समजताच घटनास्थळी अमरावती पोलीस आयुक्त अरविंद चावरिया दाखल झाले आहेत. फरार हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांनी लगोलग दोन पथके रवाना केली. काही तासांतच पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. एएसआय दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यावर जर असा हल्ला होत असेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.
🟥पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला.- स्फोटकांनी भरलेली कार सैन्याच्या ताफ्याला धडकली. ( स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी.)
पेशावर :- वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागातील उत्तरी वजीरिस्तान इथं आत्मघातकी हल्ला झाला आहे. या बॉम्बस्फोटात १३ हून अधिक पाकिस्तानी सैनिक ठार झाले तर २० हून अधिक जखमी झाले आहेत. मीर अली खादी मार्केटमध्ये झालेल्या या हल्ल्यात जखमींमध्ये १२ हून अधिक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. ज्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे बोलले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कारने पाकिस्तानी सैन्याच्या एका वाहनाला जोरदार टक्कर मारली. ते बॉम्ब डिस्पोजल (EOD) युनिटचे वाहन होते. सैन्याचे वाहन नागरी भागात ड्युटीवर जात होते. त्यावेळी हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची पाकिस्तानातील दहशतवादी संघटना तहरीक ए तालिबान पाकिस्तान(TTP) चा गट उसूद उल हर्ब याने जबाबदारी घेतली आहे. या आत्मघातकी हल्ल्यात स्फोटकांनी भरलेली कार सैन्याच्या ताफ्याला धडकली त्यातून झालेल्या स्फोटात १३ सैनिक ठार झाले. १० जवान जखमी आहेत त्याशिवाय १९ सर्वसामान्य नागरिकही जखमी झाले. या स्फोटाने आसपासच्या रहिवासी घरांनाही मोठे नुकसान झाल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
तर हा स्फोट इतका भयंकर होता की, त्याच्या आवाजाने २ घरांवरील छत खाली कोसळली आणि त्यात ६ मुले जखमी झालेत. हा आत्मघातकी हल्ला अशावेळी झाला जेव्हा पाकिस्तानात विशेषत: खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तान प्रांतात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. यावर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानी सैन्याने टीटीपी दहशतवादी संघटनेशी निगडीत १० संशयित दहशतवाद्यांना मारले होते. मार्चमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी गुडालार आणि पीरू कुनरी येथील जाफर एक्सप्रेस ट्रेनवर हल्ला केला होता. ज्यात २१ प्रवासी आणि ४ अर्धसैनिक दलाचे जवान मारले गेले होते. दरम्यान, जागतिक दहशतवादी आकडेवारी २०२५ नुसार, पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या ४५ टक्क्यांनी वाढली आहे. २०२३ साली ७४८ जणांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. २०२४ साली मृतांचा आकडा १०८१ पर्यंत वाढला. त्याशिवाय पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जगातील दुसऱ्या क्रमांकाची आहे.
🟥उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार.- उत्तरकाशीमध्ये ढगफुटी.8 ते 10 कामगार बेपत्ता.- बचावकार्य सुरू
डेहराडून :- वृत्तसंस्था

उत्तराखंडमध्ये शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. राज्याच्या उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून बांधकामाच्या साईटवरील ८ ते १० कामगार बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली आहे.
🟥यासंदर्भात बडकोटचे पोलिस अधिकारी दीपक कठेत यांनी सांगितले की, यमुनोत्री महामार्गावर ढगफुटी झाल्याची माहिती मिळाली होती. पथकाने घटनास्थळी पोहोचल्यावर पाहिले की, येथे रस्त्याच्या आणि इतर कामांमध्ये गुंतलेले काही लोक तंबू टाकून राहत होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते वाहून गेले आहेत. आतापर्यंत ८ ते १० जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. हे सर्व नेपाळी वंशाचे आहेत. तर उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी प्रशांत आर्य म्हणाले की, शनिवारी मध्यरात्रीनंतर यमुनोत्री महामार्गावर पालीगाड ओजरी डाबरकोट दरम्यान ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत हॉटेलचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी राहणारे ८ ते १० कामगार बेपत्ता झाले. यमुनोत्री मार्गावरही परिणाम झाला आहे. बेपत्ता मजुरांच्या शोधासाठी प्रशासनाचे पथक आणि एसडीआरएफकडून बचावकार्य सुरू असल्याचे आर्य यांनी सांगितले.
ढगफुटीनंतर यमुनोत्री महामार्ग सिलाई बँडसह अनेक ठिकाणी बंद आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पथक रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न करत आहे. तर, ओझरीजवळचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. शेतांमध्ये ढिगारा साचला आहे. स्यानाचट्टी येथील कुपडा कुंशाला त्रिखिली मोटर पूलही धोक्यात आला आहे. यमुना नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.यमुनोत्री महामार्गावरील स्याना चट्टीजवळ कुपडा कुनसाला मोटर मार्गावरील पुलाजवळ वरून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड आल्याने यमुना नदीचा प्रवाह थांबला आणि येथे तलाव तयार होऊ लागला आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि यमुना नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला आहे. आज रविवार पासून पुढील 3 दिवस राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर इतर अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आगामी 1 जुलै पर्यंत राज्यातील डेहरादूनसह टिहरी, पौडी, चंपावत, हरिद्वार, नैनिताल आणि उधमसिंह नगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आल्याचे हवामान विज्ञान केंद्राचे संचालक बिक्रम सिंह यांनी सांगितले.