🛑’कांटा लगा’ गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे निधन.
🟥पोलीस दलात मोठी खांदेपालट.५० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या.
🛑’कांटा लगा’ गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे निधन.
मुंबई :- प्रतिनिधी.
‘कांटा लगा’ या गाण्यानं प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं निधन झालं आहे. वयाच्या ४२ व्या शेफाली जरीवाला हिनं मुंबईत अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या धक्क्यानं शेफाली जरीवाला हिचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शेफालीच्या मृत्यूने संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कांटा लगा गाण्यामुळे रातोरात स्टार झालेली शेफाली जरीवालाच्या निधनाच्या बातमीमुळे मनोरंजन विश्वात मोठी शोककळा पसली आहे. 2002 साली आलेल्या या गाण्याने बॉलिवूडमध्ये एक वेगळं नाव आणि चेहरा मिळाला. या गाण्याने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. हे गाणं इतकं फेमस झालं की तिला कांटा लगा गर्ल म्हणून ओळखलं जाऊ लागलं. दरम्यान, शेफालीला ‘कांटा लगा’ या गाण्यातून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तिने अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं. पराग व शेफालीने ‘नच बलिए’ या डान्स रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला होता. तसेच शेफालीने सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांच्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात खास भूमिका केली होती.
शेफालीला तिचा पती, अभिनेता पराग त्यागीने तातडीने रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर, तिचा मृतदेह पोस्टमॉर्टम तपासणीसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. असे समजते. शेफालीच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. शेफाली रातोरात स्टार झाली होती. त्यानंतर ‘मुझसे शादी करोगी’, ‘नच बलिए’ आणि ‘बिग बॉस 13’ यांसारख्या कार्यक्रमांमध्येही ती झळकली. सोशल मीडियावरही शेफाली कायम सक्रिय होती आणि मानसिक आरोग्य तसेच महिलांच्या हक्कांसाठी तिने आवाज उठवला होता. शेफाली जरीवालाच्या निधनाने मनोरंजनसृष्टीतील एक तेजस्वी, बिनधास्त आवाज हरपला आहे.
🟥पोलीस दलात मोठी खांदेपालट.५० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या.
मुंबई :- प्रतिनिधी.
राज्यातील महायुती सरकारकडून गेल्या काही महिन्यात आएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या होत असून आता तब्बल 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, धुळे, हिंगोली, जळगाव येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
यात पुण्यातील शस्त्र निरीक्षक शाखा पोलीस अधीक्षकपदी असलेल्या तेजस्वी सातपुते यांची समादेशकपदी बदली करण्यात आली आहे. पुणे राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पदावर त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर, महेंद्र पंडित यांची स्तंभ 2 मधून स्तंभ 3 मध्ये नमूद पदावर बदली करण्यात आली आहे. त्यानुसार, महेंद्र पंडित यांना बृह्न्मुंबई पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून तब्बल 81 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून 51 IPS अधिकार्यांना काहींना प्रमोशन तर काहींचे डिमोशन करुन बदली करण्यात आली आहे.
🟥पुण्यातील परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे बदली करण्यात आली असून वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांची देखील बदली करण्यात आली आहे. सरकारच्या नव्या बदली आदेशान्वये पुण्यामध्ये तीन नव्या आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात गेल्या 15 दिवसांपूर्वी 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर गेल्या आठवड्यात पुन्हा चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यामध्ये मुंबई मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांची वर्ध्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर अमरावतीचे आयुक्त सचिन कळंत्रे यांची बदली पुण्यातील यशदाचे उपसंचालकपदी करण्यात आली. त्यानंतर, आता 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.