आजऱ्यात गॅस गिझर मधील गॅस गळती होऊन नवविवाहित दाम्पत्याचा गुदमरून मृत्यू.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथे एक महिन्यापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझर मधील गॅस गळती झाल्याने गुदमरून मृत्यू झाल्याची घटना आजरा जवळील भावेश्वरी कॉलनी येथे घडली. सागर सुरेश करमळकर (वय ३२) व सुषमा सागर करमळकर (वय ३०) अशी मयत पती पत्नीची नांवे आहेत.
सागर व सुषमाचा विवाह २० मे रोजी झाला होता. सागर यांचे आजरा शहरातील शिवाजीनगर येथे घर आहे. गेल्या वर्षीच त्यांनी आजरा पासून जवळ असणाऱ्या महागांव रोड शेजारी बुरुडे गावाजवळील भावेश्वरी कॉलनी येथे बंगला बांधला होता. लग्नानंतर सागर व त्याची पत्नी तेथेच रहात होते. सुषमा हीचे माहेर धारवाड (कर्नाटक राज्य) येथील आहे. काल (रविवारी) सागर आपली पत्नी व मित्रांबरोबर आंबोलीला फिरायला गेले होते.
त्यानंतर रात्री व सकाळी सागरच्या मित्रांने मोबाईलवर संपर्क साधला मात्र मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आले. मित्रांने तातडीने घर गाठले. दार उघडून आत जावून हाक मारली मात्र कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. याची कल्पना मित्राने सागरचे कुटुंबीय व इतर मित्रांना दिली. सर्वांनी जाऊन पाहिले असता सागर व त्याची पत्नी सुषमा बाथरूम मध्ये मृतावस्थेत आढळले. बाथरूम मधील गॅस गिझर मधील गॅस गळती झाल्याने गुदमरून दोघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याची माहिती मिळताच आजऱ्याचे सहा. पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी तातडीने भेट दिली. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे सपोनि यमगर यांनी सांगितले.