🟥राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा.
🟥अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीला मुदतवाढ.-
आता ५ जूनपर्यंत करता येणार नोंदणी.
🟥राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा.
मुंबई :- प्रतिनिधी.
राज्यात सतत हवापालट होत आहे. महाराष्ट्रातील आज सात जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. बाकी उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल अथवा कडकडीत ऊन असेल असा इशारा दिला आहे. पाऊस गेल्यानंतर प्रचंड उकाडा आणि घामाच्या धारा निघत असल्याने लोक हैराण झाली आहे. मान्सूनला ब्रेक लागला असून पुन्हा पाऊस कधी येणार याची आतूरतेनं वाट पाहात आहेत.
राज्यात आगामी काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांसाठी पावसाचा आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. 3 ते 6 जून दरम्यान हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस, मेघगर्जना आणि 30 ते 50 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा फटका राज्याच्या काही भागांना बसणार असल्याचा अंदाज आहे. पालघर जिल्ह्यात आज हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 4 आणि 5 जून रोजी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर 6 जून रोजी पुन्हा हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. ठाणे जिल्ह्यातही ढगांच्या गडगडाटासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 4 जून रोजी हलका पाऊस, 5 जून रोजी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि पाऊस राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
🛑मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे उपनगरांमध्ये आज हलका ते मध्यम पाऊस होणार असून, 4 जूनला तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल. त्यानंतर 5 आणि 6 जून रोजी मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात 3 जून रोजी मध्यम पाऊस होणार आहे. 4 जूनला हलका ते मध्यम पाऊस, तर 5 आणि 6 जूनला पुन्हा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, 4 ते 6 जून दरम्यान पावसाचा जोर कमी होईल. पुन्हा ऊन पावसाचा खेळ सुरू होईल. उत्तर महाराष्ट्रात पावसासह वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये आज तुरळक पावसाचा अंदाज आहे. 4 जूनला विजांच्या कडकडाटासह वादळे आणि पाऊस होईल. 5 जून रोजी वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.
🟥अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीला मुदतवाढ.-
आता ५ जूनपर्यंत करता येणार नोंदणी
मुंबई :- प्रतिनिधी.
दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी इयत्ता 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात 31 मे 2025 रोजी एक सुधारित अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, राज्य शासनाने इन-हाऊस कोट्याच्या जागा भरण्याच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत.
पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे, विद्यार्थी नोंदणीसाठी 3 जून 2025 ही अंतिम तारीख होती. मात्र आता विद्यार्थ्यांना अधिक वेळ देत ही मुदत 5 जून 2025 रोजी दुपारी २ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही माहिती प्र. शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे. नवीन निर्णयानुसार, खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा इन-हाऊस कोट्यासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. मुंबई शहर, उपनगर व ठाणे जिल्ह्यांत एका संस्थेची शाळा व कनिष्ठ/वरिष्ठ महाविद्यालय यांचा एक युनिट ग्राह्य धरला जाणार आहे. इतर जिल्ह्यांत महसूली जिल्हा हे इन-हाऊस कोट्यासाठी युनिट मानले जाईल.
🟥महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न शाळांनी जर इन-हाऊस कोट्यांत बदल केल्यास, विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमात सुधारणा करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी नोंदणीची मुदत वाढवण्यात आली आहे. इन-हाऊस कोट्यामधील पसंतीक्रम आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच पालक तसेच विद्यार्थी यांना पुरेसा वेळ मिळावा याकरीता विद्यार्थी नोंदणी अंतिम दिनांक 3 जून ऐवजी आता 5 जून 2025 रोजी दुपारी 2 पर्यंत करण्यात येत असल्याचे सरकारने म्हटले आहे.
