पावसाने स्वप्नांचा केला चुराडा.- ३०० गोणी कांदे वाहून गेले.- लेकीला चप्पल घेण्याचं आश्वासनही अपूर्ण
पुण्यात मुसळधार पाऊस.- बारामतीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस;श.- इमारती खचल्या, कालवा फुटला.- कार वाहून गेली
पावसाने स्वप्नांचा केला चुराडा.- ३०० गोणी कांदे वाहून गेले.- लेकीला चप्पल घेण्याचं आश्वासनही अपूर्ण
बीड :- प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसतोय. आज सकाळपासून मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. मान्सून देखील दाखल झाला आहे. यंदा वीस दिवस अगोदरच मॉन्सून राज्यात दाखल झाला. शेतकऱ्यांचे पेरणीचे काम शिल्लक आहेत. मुळात म्हणजे पाऊस सतत सुरू असल्याने शेतकऱ्यांना पेरणी अगोदरची कामे पूर्ण करण्यासही वेळ मिळाला नाहीये. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झालंय. अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. बीडमध्ये मागील सहा दिवसापासून पाऊस हजेरी लावत आहे.
आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी येथील महेश बापू दरेकर यांनी तीन एक्करमध्ये कांद्याची लागवड केली होती. त्यांनी कांदा शेतात काढून ठेवला होता मार्केटमध्ये नेण्यासाठी मात्र गेली सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु असल्याने महेश दरेकर यांच्या शेतातील जवळपास 300 गोणी कांदा अक्षरशः शेतात वाहून गेला. कांदयाचा चिखल झाला आहे. भर पावसात दरेकर कुटुंबातील चिमुकली अगदी सहा वर्षाची कांदा गोळा करत आहे. शेतकरी महेश दरेकर यांची मुलगी प्रगती हिला वाटतंय की, कांदा विकल्यावर माझे पप्पा मला चप्पल घेतील, शाळेची फिस भरतील पण आज महेश दरेकर यांच्या हातात कांद्याचे पैसे ऐण्याऐवजी फक्त कांद्याचा चिखलच आहे.
चिमुकली प्रगती म्हणते की, मी आता शाळेत कशी जाणार, पप्पा माझी फि कशी भरणार तुम्हीच मदत करा साहेब…आमची पाच महिन्यांची मेहनत पाण्यात गेली, आमचे सर्व रस्ते बंद झालेत, मजूरांचे पैसे देणे बाकी आहे, उदया पेरणीचे दिवस आलेत खत बियाणे कुठून आणायची. मुलांची फि आहे, आज कांद्याचे पैसे हातात येण्याऐवजी कांद्याचा चिखलच आमच्या हातात आहे, अशी भावनिक साद चिमुकल्या प्रगतीची आई सोनाली दरेकर यांनी केली आहे. कांदे वाहून गेल्याने संपूर्ण कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी आलंय. ८० हजार खर्च करत दरेकर कुटुंबियांनी कांद्याची लागवड केली होती. वरूण धो धो पाऊस सुरू असतानाही संपूर्ण कुटुंब चिखलात कांदा वेचत आहे.
पुण्यात मुसळधार पाऊस.- बारामतीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस;श.- इमारती खचल्या, कालवा फुटला.- कार वाहून गेली
पुणे :- प्रतिनिधी.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहा:कार बघायला मिळत आहे. पुण्यात दौंड, बारामती इथे तर तुफान पाऊस पडत आहे. बारामतीत ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याची माहिती मिळत आहे. यामुळे तीन इमारती खचल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर दौंडमधील एका गावात अनेक घरे हे पाण्याखाली गेल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यात दररोज पाऊस पडतोय. मान्सूनचं आगमन होण्यापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहा:कार माजवला आहे. नाशिकच्या सिन्नर बस स्थानकावर तर धक्कादायक घटना घडली आहे. इथे शिवशाही बसवर बस स्थानकाचा स्लॅब कोसळला आहे. या घटनेचे दृश्य अंगावर काटा आणणारे आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप आलेली नाही.
पुण्याच्या दौंड तालुक्यात पावसाचं आक्राळविक्राळ रुप बघायला मिळालं. गेल्या चार दिवसांपासून दौंड तालुक्यात पावसाचा जोर सुरू आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या गावात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. पावसाच्या हाहा:काराने पुणे-सोलापूर महामार्गावरील एक इनोव्हा कार वाहून गेली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पुणे-सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने वाहतूक ठप्प झालीय. याशिवाय स्वामी चिंचोली गावात अनेक घरं पाण्याखाली गेल्याची माहिती आता मिळत आहे.