🟥ऐन पेरणीच्या दिवसांत भात लावणीचा हंगाम असल्यासारखा संततधार पाऊस! ( बाजार पेठा ओस.- व्यापारी, शेतकरी चिंताग्रस्त..)
सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी.
पारंपरिक पद्धतीने शेती करणारे तालुक्यातील शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला सुरुवात करायचे. तोपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचला असल्याचे सुतोवाच कळायचे.पण यावेळी अवकाळी पावसाची हजेरी संबंध महिनाभर आपण सारेच अनुभवतो आहोत.बागायती फळांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. हा नासाडी करणारा पाऊस काही दिवसांत पाठ फिरवील अशी प्रत्येकाची मानसिकता होती.परंतु संपूर्ण मे महिनाभर धुमाकूळ घालणारा पाऊस पाहून सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ऐन सुट्टीत गावाला आलेल्या चाकरमानी वर्गाला निमूटपणे माघारी फिरावे लागले.अवकाळी पावसाने लग्न, सार्वजनिक पुजा, जयंती उत्सवाच्या आनंदावर पाणी फेरले.
व्यापारी वर्गाला याचा मोठा फटका बसला आहे.मे महिन्यात रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ असायची.पण अवकाळी पावसाने बाजार पेठेत म्हणावी तशी ग्राहकांची वर्दळ दिसत नाही. परिणामी व्यापार मंदावला असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.केवळ शेतीवर गुजराण असणाऱ्या बळीराजाची चिंता या अवकाळी पावसाने वाढवली आहे. दरवर्षी मृग नक्षत्राची चाहूल लागताच सजग होणारा शेतकरी यावेळी निसर्गाच्या लहरीपणामुळे पुरता गोंधळून गेला आहे. ऐन पेरणीच्या दिवसांत शेताच्या बांधावरून पावसाचे पाणी वहात आहे.
पावसाने काही दिवसांची विश्रांती घेतली तरच कोकणातील पेरणी सुलभ होऊ शकते. पेरणी नंतर नियमित पाऊस पडला तरच शेती बहरेल अन्यथा कोकणातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागेल. हे विखारी वास्तव आहे.