Home कोंकण - ठाणे मुंबई, कोकणसह राज्यात पुढील २ दिवस जोरदार पाऊस कोसळणार.- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...

मुंबई, कोकणसह राज्यात पुढील २ दिवस जोरदार पाऊस कोसळणार.- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी🟥अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक कारवाई – ड्रग फ्री पुणे’ मोहिमेअंतर्गत तस्कर, विक्रेत्यांची माहिती संकलित🟥पालखी मार्गावरील अडथळे दूर करावेत – पुणे पोलिसांकडून पालखी संस्थान पदाधिकाऱ्यांसोबत संवाद!.

Oplus_131072

🟥मुंबई, कोकणसह राज्यात पुढील २ दिवस जोरदार पाऊस कोसळणार.- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी
🟥अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक कारवाई – ड्रग फ्री पुणे’ मोहिमेअंतर्गत तस्कर, विक्रेत्यांची माहिती संकलित
🟥पालखी मार्गावरील अडथळे दूर करावेत – पुणे पोलिसांकडून पालखी संस्थान पदाधिकाऱ्यांसोबत संवाद!.

🟥मुंबई, कोकणसह राज्यात पुढील २ दिवस जोरदार पाऊस कोसळणार.- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई :- प्रतिनिधी.

मुंबई आणि कोकणासह राज्यभरात 24 मे पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यताही आहे. हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी जारी करण्यात आला आहे. काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तळकोकणात सलग तिसऱ्या दिवशीही मान्सूनपूर्व पावसाने झोडपले. रात्रभर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्यात 23 मे पर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गोवा तसेच लगतच्या कर्नाटक किनारपट्टीला समांतर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने या क्षेत्राची तीव्रता वाढणार असून, ते पुढे उत्तरेकडे सरकणार आहे. याच्या प्रभावामुळे कोकणात पावसाचा जोर कायम असणार आहे. पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

🟥महाराष्ट्र आणि गोव्या जवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ 22 ते 24 मे दरम्यान समुद्र खवळू शकतो. तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

🟥अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक कारवाई – ड्रग फ्री पुणे’ मोहिमेअंतर्गत तस्कर, विक्रेत्यांची माहिती संकलित!

पुणे :- प्रतिनिधी.

शहरात अमली पदार्थ विक्री करणारे तस्कर, पुरवठादारांविरुद्ध ‘ड्रग फ्री पुणे’ मोहिमेअंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विक्री प्रकरणी दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करण्यात येणार आहे.

पोलीस महासंचालक कार्यालयाने अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यभरातील विविध शहरात अमली पदार्थ तस्कर, पुरवठादारांविरुद्ध कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. या पुढील काळात अमली पदार्थ विक्रेत्यांसह त्यांना अमली पदार्थ पुरविणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावे, असे आदेश देण्यात आले आहे.त्यानुसार पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना अमली पदार्थ विक्रेते, तस्करांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेले अमली पदार्थ विक्रेते, तस्करांची माहिती संकलित करण्यात यावी, तसेच त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

शहरात अमली पदार्थ कसे येतात. अमली पदार्थ पुरवठादार, तस्कर, किरकोळ विक्रेत्यांची माहिती संकलित करण्यात यावी, असे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. शहरातील पाच परिमंडळातील पोलीस उपायुक्तांनी पोलीस ठाण्यांशी समन्वय साधून अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी. शाळा, महाविद्यालये, उपाहारगृह, पबच्या परिसरात पोलिसांनी लक्ष ठेवावे, असे आदेशात म्हटले आहे.

🟥पालखी मार्गावरील अडथळे दूर करावेत – पुणे पोलिसांकडून पालखी संस्थान पदाधिकाऱ्यांसोबत संवाद!

पुणे :- प्रतिनिधी

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावर सुरू असलेली रस्त्यांची कामे वारकरी, भाविकांसाठी अडथळा ठरण्याची शक्यता आहे. विश्रांतवाडीतील मुख्य चौकात सुरू असलेले रस्त्याचे काम आणि दिवे घाटातील कामे पालखी मार्गात अडथळा ठरू शकतात. कामांची पूर्तता पालखी प्रस्थानापूर्वी व्हावी, अशी मागणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीकडून करण्यात आली. त्यानंतर संबंधीत यंत्रणेशी समन्वय साधून पालखी सोहळ्याचे आगमन हाेण्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. पोलीस आयुक्त कार्यालयात बुधवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान प्रमुख, पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख डाॅ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. रोहीणी पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संत तुकाराम महाराज संस्थानचे पदाधिकारी जालिंदर मोरे, वैभव मोरे, दिलीप मोरे या वेळी उपस्थित होते. पालखी आगमन, प्रस्थान सोहळा, बंदोबस्त, वाहने लावण्याची व्यवस्था याबाबत बैठकीत चर्चा झाली. गेल्यावर्षी गतवर्षी पालखी आगमन झाल्यानंतर मुक्कामाच्या ठिकामी पोहोचण्यास विलंब झाला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी होणारी भाविकांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त नेमण्यात यावा, अशी मागणी यावेळी आळंदी संस्थानच्या विश्वस्तांकडून करण्यात आली.

शहरात पालखीचे आगमन, प्रस्थान सोहळ्याला होणारी गर्दी विचारात घेऊन पालखी सोहळ्यात बंदोबस्त वाढविण्यात येईल, तसेच ठिकठिकाणी लोखंडी कठडे बांधण्यात येईल. जेणेकरुन पालखी सोहळा जलदगतीने मार्गस्थ होईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

पालखी सोहळ्यासोबत दिंड्या असतात. दिंड्यामध्ये वाहनेही असतात. वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, तसेच पोलीस आणि पालखी सोहळ्यांच्या विश्वस्तांमध्ये समन्वय साधण्यासाठी समाजमाध्यमात एक समुह करावा. जेणेकरुन पोलीस आणि विश्वस्तांमध्ये संवाद साधणे शक्य होईल, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.