Homeकोंकण - ठाणेराज्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द.( मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश. )🟥महाराष्ट्रातील ४...

राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द.( मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश. )🟥महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यात ‘ड्रोन’ ? – जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट मोडवर.- राज्यात खळबळ.

🛑राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द.
( मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश. )
🟥महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यात ‘ड्रोन’ ? – जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट मोडवर.- राज्यात खळबळ.

मुंबई :- प्रतिनिधी.

भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या पदांवरील विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. भारत पाक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत.

मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध दिशानिर्देश दिले. प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गृहविभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक शिरीष जैन, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी कोणते निर्देश दिले?

प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करा.

ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.

ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागरण करा.

केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’ चे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्या.

प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.

प्रत्येक जिल्हाधिकारी यांना आपत्कालीन फंड आजच देणार, ज्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करायची असतील तर ती तत्काळ करता येईल. याव्यतिरिक्त कोणताही महत्वाचा प्रस्ताव यासंदर्भात आला तर तो 1 तासात मंजूर करा.

एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांची बैठक घ्या, त्यांनाही ‘ब्लॅकआऊट’ बाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगा. यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घ्या.

पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.

सैन्याच्या तयारी संबधित गतिविधीचे चित्रिकरण करणे आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हा गुन्हा आहे, त्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा.

सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्या.

नागरिकांना परिस्थितीबाबत अद्ययावत व खरी माहिती पोहोचवणे यासाठी शासनाकडून व्यवस्था उभी करा.

शासनाच्या अतिमहत्वाच्या पायाभूत सुविधा (उदा. विद्युतनिर्मिती, वितरण) यावर सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडून त्वरित सायबर ऑडिट करून घ्या.

सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यात अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्याचे तिन्ही दल तसेच कोस्टगार्डच्या प्रमुखांना पुढील बैठकीत व्हीसी माध्यमातून निमंत्रित करा.

🟥महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यात ‘ड्रोन’ ? – जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट मोडवर.- राज्यात खळबळ

परभणी :- प्रतिनिधी.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढला असून चहूबाजूने गोळीबार आणि हवाई हल्ला सुरू आहे. गुरुवारी रात्रीपासूनच पाकिस्तानकडून द्रोण हल्ले सुरू आहे.मात्र भारताने सर्व द्रोण हल्ले हाणून पाडले.शुक्रवारी पुन्हा उरी सेक्टरमध्ये संध्याकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची घटना समोर आली आहे. त्याचदरम्यान, महाराष्ट्रातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील परभणी, बुलढाणा आणि जालना या जिल्ह्यात ड्रोन सदृश वस्तू दिसली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

परभणीच्या सेलू,गंगाखेड तालुक्यातून आकाशात ड्रोन सदृश वस्तू दिसली आहे. मात्र, गावकऱ्यांमध्ये कुतूहलाचा विषय निर्माण झाला आहे. एकीकडे भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु आहे. त्याच अनुषंगाने अनेक ठिकाणी मॉक ड्रिल घेतलं जात आहे. याचदरम्यान परभणीच्या सेलू आणि गंगाखेड तालुक्यातून आकाशात एकाच लाईनमध्ये अनेक ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्या आहेत. ग्रामीण भागात यामुळे कुतूहलला विषय झालाय. या काही भागात भीतीचं वातावरणही पसरलं आहे.

तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरात शुक्रवारी सायंकाळी अनेक वस्तू आकाशातून एका रांगेत जाताना दिसल्या. चकाकणाऱ्या या रांगेत जाणाऱ्या आकाशातील वस्तूंमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नेमक्या हे काय आहे? याबाबत आता परिसरात चर्चेला उधाण आलं आहे. तिकडे भारत-पाकमध्ये हल्ला हमला सुरु असताना अशा वस्तू आकाशातून जाताना दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या कोणत्या वस्तू आकाशातून जात आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
🟥जालना जिल्ह्यातील मंठा, घनसावंगी, परतूर याठिकाणीही ड्रोन सदृश वस्तू दिसल्या आहेत. पोलीस प्रशासनाकडून ड्रोन सदृश वस्तूचा शोध सुरू आहे. जालना जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्या आहेत. जालना जिल्ह्यातील मंठा, घनसावंगी आणि परतुरध्ये अनेक गावांमध्ये ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्यानं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून या ड्रोन सदृश्य वस्तूचा शोध सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांना बळी पडू नये, असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे.त्याचदरम्यान, हिंगोली जिल्ह्यातही ड्रोन सदृश्य वस्तू दिसली आहे. नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात फोटो आणि व्हिडिओ काढले आहे. औंढा तालुक्यातील गोजेगाव शिवारात नागरिकांना हे चित्र दिसलं आहे. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.