🛑देऊळवाडी – ईटे – चित्री धरणं रस्त्याची चाळण.- गावभर पुढारी शिवारभर राम राम.- शालेय विद्यार्थ्यांची व्यथा
🎾सलग दोन षटकार.- प्रेक्षकांकडून तिसऱ्या षटकाराची मागणी.- तरुण सरसावला अन् कोसळला.- मैदानातच तरूण क्रिकेटरचा करुण अंत..
🛑राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर.- सुप्रीम कोर्टाने दिली पुढची २५ फेब्रुवारी तारीख
🟥भर समुद्रात गोळीबाराचा थरार.- श्रीलंकेच्या नौदलाकडून भारतीय मच्छिमारांवर गोळीबार
( ५ मच्छिमार जखमी. )
🛑देऊळवाडी – ईटे – चित्री धरणं रस्त्याची चाळण.- गावभर पुढारी शिवारभर राम राम.- शालेय विद्यार्थ्यांची व्यथा.
आजरा.- प्रतिनिधी

आजरा तालुक्यातील देऊळवाडी – ईटे व चित्री धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे. यामध्ये देऊळवाडी व ईटे येथील स्थानिक रहिवासी व शालेय विद्यार्थी यांना या रस्त्यावरून ये – जा करताना कसरत होत आहे. शालेय विद्यार्थी म्हणतात आमच्याकडे गावभर पुढारी आहेत. परंतु या रस्त्याकडे कुणी लक्ष देत नाही. आमचा आमदार लय भारी आहे. पण येथील पुढारी या चाळण झालेल्या रस्त्याकडे का लक्ष देत नाहीत असा प्रश्न आम्हाला पडला आहे.
हा रस्ता तात्काळ दुरुस्त व्हावा. अशी मागणी शालेय विद्यार्थी व नागरिक करत आहेत. दुसरीकडे चित्री प्रकल्पाकडे जाणारा रस्ता देखील चालत जाण्याचा अवस्थेत नाही. मग येथील पर्यटक व तालुक्यातील नागरिक त्यांना वाहने घेऊन जाताना कसरत करावी लागते.
२०२४ सालात या मतदारसंघातील अनेक रस्ते झाले. मग या मार्गावर रस्ते का झाले नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे. सद्यस्थितीत या रस्त्याची अवस्था फार बिकट आहे. तेव्हा लवकरात लवकर सतत रस्ता करावा अशी मागणी होत आहे.

🎾सलग दोन षटकार.- प्रेक्षकांकडून तिसऱ्या षटकाराची मागणी.- तरुण सरसावला अन् कोसळला.- मैदानातच तरूण क्रिकेटरचा करुण अंत..
वसई :- प्रतिनिधी

पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकल्यानंतर सलग तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकताना तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वसई तालुक्यातील कोपर गावात राहणाऱ्या २७ वर्षीय सागर वझेच्या निधनानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उत्तम फलंदाजी करणारा तरुण अशी सागरची पंचक्रोशीत ओळख होती. क्रिकेटवर त्याचं अतिशय प्रेम होतं. पण क्रिकेट खेळतानाच नियतीनं त्याच्यावर घाला घातला.
वसई तालुक्यातील कोपर गावात राहणारा सागर वझे उत्तम क्रिकेट खेळायचा. शुक्रवारी संध्याकाळी क्रिकेटचा सामना रंगला होता. त्यानं प्रतिस्पर्धी गोलंदाजावर तुटून पडत सलग दोन षटकार ठोकले. त्यानंतर प्रेक्षकांकडून तिसऱ्या षटकाराची मागणी होऊ लागली. तिसरा षटकार ठोकण्यासाठी सागर पुढे सरसावला. तो क्रीझबाहेर आला. तो तिसरा षटकार माळणार इतक्यात त्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे तो जागीच कोसळला. फलंदाजी करताना कोसळलेल्या सागरच्या मदतीसाठी सगळ्याच खेळाडूंनी धाव घेतली. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तरुण वयात क्रिकेट खेळताना सागरचा अकाली मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सागरचा खेळ यापुढे पाहता येणार नाही, असं म्हणत परिसरातील क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंनी शोक व्यक्त केला. क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला सागर वझेला डॉक्टरांनी दिला होता. पण खेळावरील प्रेम त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यामुळेच तो शुक्रवारी संध्याकाळी क्रिकेट खेळायला मैदानात उतरला. आवडता खेळ खेळत असतानाच सागरनं जीव गमावला. सागर वझेच्या अकाली निधनानं परिसरावर शोककळा पसरली आहे. तरुण वयात क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याने त्याचा आता खेळ पाहता येणार नसल्याची भावना परिसरातील क्रिकेटप्रेमी व खेळाडूंनी व्यक्त केल्या.
🛑राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर.- सुप्रीम कोर्टाने दिली पुढची २५ फेब्रुवारी तारीख
मुंबई :- प्रतिनिधी
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत. ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून यावर आज अंतिम सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा पुढची तारीख दिल्याने राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात २५ फेब्रुवारीला पुढील सुनावणी पार पडणार आहे.
गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या आधी या निवडणुका होण्याची शक्यता वाटत होती. मात्र उन्हाळ्यात तरी या निवडणुका होणार का? याबाबत सवाल उपस्थित होत आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूरसह अनेक महापालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे जवळपास तीन ते चार वर्षांपासून तिथे लोकप्रतिनिधींशिवाय प्रशासकामार्फत कामकाज सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरू असून दरवेळी पुढची तारीख मिळत असल्याने निवडणुका प्रलंबित राहिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि ओबीसी आरक्षणावर पुढील सुनावणी आता २५ फेब्रुवारी होणार असल्यानेआताया निवडणुका पुन्हा आणखी एक महिना पुढे ढकलण्यात येणार आहेत.
राज्य सरकारच्यावतीने तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली. वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाने २५ फेब्रुवारी ही तारीख दिली आहे. त्या दिवशी जर अंतिम सुनावणी झाली तरच एप्रिल- मे महिन्यात निवडणुका होतील. नाहीतर पुन्हा लांबणीवर पडतील. त्यामुळे २५ फेब्रुवारीची तारीख महत्त्वाची आहे. याचिकाकर्त्यांचे वकिल देवदत्त पालोदकर यांनी सांगितले की, ५ फेब्रुवारीला सुनावणी होणार होती, मात्र त्यादिवशी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळं कोर्टाने २५ फेब्रुवारी तारीख दिली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात पार पडल्यानंतर राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटाने मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यादृष्टीने मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. मात्र कोर्टाच्या विलंबामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.
🟥भर समुद्रात गोळीबाराचा थरार.- श्रीलंकेच्या नौदलाकडून भारतीय मच्छिमारांवर गोळीबार
( ५ मच्छिमार जखमी. )
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था
श्रीलंकेच्या नौदलाने डेल्फ्ट बेटाजवळ भारतीय मच्छिमारांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात ५ भारतीय मच्छिमार जखमी झाले. जखमींपैकी २ मच्छिमारांची प्रकृती गंभीर आहे. तर अन्य तिघांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं गोळीबाराची गंभीर दखल घेतलेली आहे. भारतानं कारवाईचा विरोध करत श्रीलंकेच्या उच्चायुक्तांना समन्स बजावलं आहे.
श्रीलंकन नौदलानं केलेली कारवाई स्वीकारार्ह नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. ‘कराईकल बंदरावरुन १३ भारतीय मच्छिमार मंगळवारी पहाटेच्या सुमारास डेल्फ्ट बेटाजवळ मासे पकडण्यास गेले होते. त्यांना श्रीलंकन नौदलानं सागरी सीमा ओलांडल्याच्या आरोपाखाली अटक केली. या दरम्यान श्रीलंकन नौदलानं गोळीबार केला,’ अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे.
मच्छिमार परुथी थुराईजवळ मासे पकडत होते. तेव्हा त्यांना श्रीलंकन नौदलाच्या गस्ती बोटीनं घेरलं. श्रीलंकेच्या नौदलानं सागरी सीमा ओलांडल्याच्या आरोपाखाली १३ मच्छिमारांना अटक केली आणि त्यांची बोट ताब्यात घेतली. मच्छिमारांनी बोट तमिळनाडूच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा श्रीलंकन नौदलानं गोळीबार केला. नौदलाच्या बोटीवर एक श्रीलंकन अधिकारीही हजर होता. गोळीबारात दोन मच्छिमार जखमी झाले. अटक करण्यात आलेल्या मच्छिमारांना कांगेसंतुरई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं,’ अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.