🛑मीरारोडमध्ये एकाच ट्रॅकवर २ लोकल ट्रेन आल्या समोरासमोर.- मोटरमनच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.
🟥मुंबई-नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात – ३ जण जागीच ठार तर १४ जण जखमी.
🛑कणकवली रेल्वे स्थानकावर दोन बांगलादेशी महिलांना एटीएस पथकाने पकडले.
मुंबई :- प्रतिनिधी.

मुंबईकरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलबाबत दररोज काही ना काही बातम्या येत असतात. मात्र आज प्रवाशांचा श्वास रोखणारी घटना समोर आली आहे. दोन लोकल ट्रेन एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याची घटना मीरारोडमध्ये घडली आहे. दोन्ही लोकल अचानक समोरासमोर आल्याने प्रवाशांच्या उराच धडकी भरली व चलबिचल सुरू झाली. पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड स्टेशनवर हा प्रकार घडला. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐन गर्दीच्या वेळी मिरा रोड रेल्वे स्थानकावर दोन्ही ट्रेन समोरासमोर येण्याची घटना घडली आहे. संध्याकाळच्या वेळी चाकरमानी कामावरून घरी परतत असल्याने सर्व लोकल गर्दीने खचाखच भरून धावत असतात. त्यामुळे चर्चगेटहून वसई-विरारकडे जाणाऱ्या लोकलला नेहमीप्रमाणे आजही मोठी गर्दी होती. मिरा रोड रेल्वे स्थानकावर संध्याकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर अचानक एकाच ट्रॅकवर दोन लोकल आल्याने मोठा गोंधळ उडाला. अचानक एकाच ट्रॅकवर दोन लोकल आल्यामुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली. दादरकडून वसईच्या दिशेनं जात असलेल्या लोकलच्या ट्रकवरच दुसरी लोकल आली.
मात्र मोटरमनच्या सतर्कतेमुळे काही मिटर अंतरावर दोन्ही ट्रेन थांबवण्यात आल्या व प्रवाशांनी सुटकेचा निस्वास सोडला. दोन्ही लोकल ट्रेन समोरासमोर येऊ लागल्याने स्टेशनवर उभे असणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली होती. स्टेशनवरील प्रवासी ओरडत होते. दोन्ही लोकल एकाच ट्रकवर आल्याने मिरारोड रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक ३ वरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. मात्र, काही वेळाने मिरारोड आणि भाईंदर रेल्वे सेवा सुरळीत झाली. सिग्नल बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचं सांगितले जात आहे. सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन्ही लोकल ट्रेन १० मिनिटे समोरासमोर उभ्या होत्या. या प्रकारानंतर प्रवासी घाबरून रेल्वे ट्रॅकवर उतरले आणि पायी चालू लागले. काहींनी दुसरी ट्रेन पकडून पुढे मार्गस्थ होणे पसंत केले.
🟥मुंबई-नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात – ३ जण जागीच ठार तर १४ जण जखमी.
ठाणे :- प्रतिनिधी.
नाशिक महामार्गावर आज पहाटे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील आठ जणांची प्रकृती चिंतानजक आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
🟥मुंबई- नाशिक महामार्गावर शहापूर येथे आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास कंटेनर, ट्रक आणि खाजगी बससह पाच वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
🅾️मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक महामार्गावर शहापूरातील गोठेघरजवळ हा भीषण अपघात घडला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, मालवाहतूक ट्रकला पाठीमागून येणाऱ्या चार वाहनांनी धडक दिली, असे सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. हा अपघातात पाचही वाहनाचे नुकसान झाले आहे.
🛑कणकवली रेल्वे स्थानकावर दोन बांगलादेशी महिलांना एटीएस पथकाने पकडले.
सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी.
कणकवली रेल्वे स्थानकावर दोन बांगलादेशी महिलांना सिंधुदुर्ग एटीएस च्या पथकाने 15 जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता पकडले. साथी अतुल माझी वय वर्षे 32, रा. कल्याण ईस्ट, मुंबई मूळ रा. लेबु खाली ता.डोगरी, जिल्हा ढाका बांगलादेश , लिझा रहीम शेख वय 28, सध्या रा. बी विंग मेरिडियन गोल्ड सोसायटी, हडपसर पुणे, मूळ रा. ढाका बांगलादेश अशी दोन्ही महिलांची नावे आहेत.एटीएस पथकातील पीएसआय सुखदेव शेवाळे ए एस आय उन्मेष पेडणेकर पोलीस नाईक रोहन चंद्रकांत सावंत यांच्यासह कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रुपेश गुरव, अंमलदार किरण मेथे, महिला अंमलदार सुप्रिया भागवत यांनी ही कारवाई केली.
🟥दोन बांगलादेशी महिला विना पासपोर्ट अथवा कागदपत्रांशीवाय कणकवलीत असल्याची माहिती ए टी एस पथकाला मिळाली होती.त्यानुसार ए टी एस चे पथक मध्यरात्री 3 वाजल्यापासून कणकवलीत दाखल झाले होते. दरम्यान कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसह ए टी एस च्या पथकाने कणकवली रेल्वे स्टेशनवर दबा धरला होता. पहाटे साडेपाच वाजता दोन बांगलादेशी महिलांना पकडून कणकवली पोलीस ठाण्यात आणून कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत ची फिर्याद ए टी एस पथकाचे पोलिस नाईक रोहन सावंत यांनी दिली आहे.विदेशी पारपत्र कलम 14 अ पारपत्र 1950 नियम 3 A 6 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगलादेशी महिला कणकवलीत आल्या कशा ? कधीपासून कणकवलीत होत्या ? कणकवलीत कोणाकडे राहिल्या होत्या ? त्यांच्यासोबत अन्य कोणी महिला पुरुष साथीदार आहेत ? कणकवलीत येण्याचा उद्देश काय ? ह्या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित असून याचा सखोल तपास कणकवली पोलीस करणार आहेत.
🟥शक्तीशाली युद्धनौका देशाला समर्पित.- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारतीय नौदलाच्या तीन युद्धनौका व पाणबुडीचे राष्ट्रार्पण
🟥संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन समितीची स्थापना.- राज्य सरकारचं मोठं पाऊल
मुंबई :- प्रतिनिधी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे भारतीय नौदलाच्या तीन महत्त्वाच्या युद्धनौका-आयएनएस सुरत, आयएनएस नीलगिरी आणि आयएनएस वाघशीर पाणबुडीचे राष्ट्रार्पण करण्यात आले. पंतप्रधान मोदींसह देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारही यावेळी उपस्थित होते.
15 जानेवारी सेना दिन म्हणूनही साजरा केला जातो. भारत भूमीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक विराला मी नमन करतो. भारतमातेच्या रक्षणात असलेल्या प्रत्येक जवानाला शुभेच्छा देतो. आज भारताचे गौरवशाली समुद्री साम्राज्य आणि आत्मनिर्भर भारतासाठीही मोठा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही नौदलाला नवी शक्ती नवा मार्ग दिली होती. त्यांच्याच पावन धरतीवर २१ दशकातील नौदलाला अधिक सशक्त बनवण्यासाठी मोठे पाऊल उचलत आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
तसेच एकाच वेळी युद्धनौका, पाणबुडींचे लोकार्पण होत आहे. या सर्व युद्धनौका मेड इन इंडिया आहेत, ही अभिमानाची बाब आहे. भारतीय नौदलाला, या नौका निर्माण करणाऱ्या कामगारांना, अभियंत्यांना शुभेच्छा देतो. आजचा कार्यक्रम आपल्या भविष्यातील आकांक्षांना जोडतो. जगभरात भारताचे सामर्थ्य वाढत असून भारत हा विस्तारवाद नाही तर विकासवादाच्या भावनेने काम करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. निलगिरी ही चौल वंशाच्या समुद्री सामर्थ्यासाठी समर्पित आहे. सूरत वॉरशीप ही भारत आणि आशियाशी जोडलेला होता त्या कालखंडाची आठवण करुन देते. काही वर्षापूर्वी मला पहिल्या सबमरीनमध्ये सामील होण्याची संधी मिळाली होती. आता मला या क्लासच्या सहाव्या पाणबुडीचे उद्घाटन करण्याचं भाग्य मिळालं. असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
🛑संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन समितीची स्थापना.- राज्य सरकारचं मोठं पाऊल
मुंबई :- प्रतिनिधी.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन समिती गठीत करण्यात आली आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखली समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. ताहलियानी यांनी याआधी दहशतवादी कसाब खटल्यातील न्यायाधीश म्हणून काम केले आहे.
राज्य सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणार आहे. माजी न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली आता या प्रकरणाचा तपास होणार आहे. तहलियानी यांनी मुंबई 26/11 बॉम्ब हल्याच्या खटल्यात न्यायमूर्ती म्हणून काम केलं आहे. तसेच प्रसिद्ध दिवंगत गायक आणि संगीतकार गुलशन कुमार यांच्या हत्येच्या खटल्यावेळीदेखील न्यायाधीश होते. तहलियानी हे निवृत्त झाले आहेत. पण राज्य सरकारने त्यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाची मोठी जबाबदारी दिली आहे.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात मा. विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेस उत्तर देताना मा. मुख्यमंत्री यांनी सभागृहात आश्वासित केल्यानुसार मस्साजोग, ता. केज, जि. बीड येथील सरपंच श्री. संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या प्रकरणी शासन निर्णय घेण्यात आला की, मस्साजोग ता. केज, जि. बीड येथील सरपंच श्री. संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश मा. एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.