‘आजरा साखर ‘ सहकार वाचविण्याचा आदर्श पॅटर्न ठरेल! – शाहू साखरचे माजी कार्यकारी संचालक विजय औताडे.
【 कारखान्यात वाचवायला शिका, कामाची एकमेकांवर ढकला ढकल न करता समन्वयाने काम करा. – बचत हेच उत्पन्न.】
आजरा. प्रतिनिधी.५
आजरा येथील आजरा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ, कामगार युनियन व विभाग प्रमुख यांना रविवार दि. ४ रोजी कारखाना कार्यस्थळावर मौलिक मार्गदर्शन व कामकाजा बाबत सुचना व मार्गदर्शन
शाहू साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक व साखर धंद्यातील गाढे अभ्यासक विजय औताडे यांनी केल्या. मार्गदर्शक सुचना देताना श्री. औताडे म्हणाले आजरा हा सहकार वाचविण्याचा आदर्श पॅटर्न ठरेल असे गौरवोद्गार काढले व बँकेच्या ताब्यातून सहकारात परत आलेला हा पहिला साखर कारखाना असल्याचे सांगितले. आजरा कारखाना आर्थिक अडचणी मुळे गेल्या दोन गळीत हंगामात बंद होता.जिल्हा बँकेने मे २०२० मध्ये थकीत कर्जापोटी ‘सरफेसी’ कायद्याखाली हा कारखाना ताब्यात घेतला होता. त्यानंतर अनेक वेळा निविदा काढूनही कारखाना चालविण्यास घेण्यास कोणीही टेंडर भरले नाही. त्यामुळे सहकारातील हा कारखाना विक्री शिवाय पर्याय राहिला नव्हता. परंतु संचालक मंडळाने मोठ्या प्रयत्नाने कारखान्याचे ७० कोटींचे थकीत कर्ज जिल्हा बँकेत भरण्याचा निश्चय केला. त्या कामी नाम. हसन मुश्रीफ व अनेक मान्यवर नेत्यांनी आणि सहकारी संस्थांनी कारखाना सहकारात रहावा म्हणून हातभार लावला व बँकेचे कर्ज भरले गेले. त्यामुळे हा कारखाना पुढे सहकारात चालविण्याचा मार्ग मोकळा झाला.
कारखाना पुढे काटकसरीने चालवून उर्जितावस्थेत आणण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढील तीन वर्ष पन्नास टक्के पगारावर काम करणेची लेखी हमी संचालक मंडळाला दिली. याबाबत श्री. औताडे यांनी गणेश पॅटर्न ची आठवण करून दिली. कर्मचाऱ्यांच्या त्यागाचेही त्यांनी कौतुक केले. त्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना बचत हेच उत्पन्न असून तुम्ही कारखान्यात वाचवायला शिका, कामाची एकमेकांवर ढकला ढकल न करता समन्वयाने काम करा, तरच तुमच्या त्यागाचे चीज होईल असे सांगून कारखान्यातील कामाची पद्धती समजावून सांगितली.
संचालक मंडळास मार्गदर्शन करताना साखर धंद्याची सध्याची स्थिती फारच बिकट असून सहकार टिकविण्यासाठी साधेपणाने कामकाज करा, खरेदी-विक्री अत्यंत पारदर्शक ठेवा, महाराष्ट्रातील साखर उत्पादन पाहता एकूण उत्पादनाच्या ७० टक्के साखर अन्य राज्यात विक्री होते त्यामुळे उत्तरप्रदेशच्या तुलनेत वाहतूक खर्च जास्त होतो व आमची साखर विक्री होत नाही आणि व्याज वाढते तसेच एफ आर पी च्या तुलनेत साखरेच्या किमान विक्री दरात वाढ न झालेने कारखान्यांच्या तोट्यात सतत वाढ होत असून कारखाने आर्थिक डबघाईला येत आहेत त्यामुळे एफ आर पी देण्यात अडचणी येत असल्याचे वक्तव्य केले. यावेळी अजिंक्यतारा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनीही कारखान्याच्या कामगारांचे कौतुक केले व कामगार आणि संचालक मंडळास मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर यांनी स्वागत केले. विजयराव औताडे यांचा सत्कार ज्येष्ठ संचालक वसंतराव धुरे यांचे हस्ते तर संजीव देसाई यांचा सत्कार चेअरमन सुनील शिंत्रे यांच्या हस्ते झाला. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन आनंदराव कुलकर्णी, संचालक अशोक चराटी, मुकुंदराव देसाई, दिगंबर देसाई, संचालिका अंजना रेडेकर, सुधीर देसाई, एम के देसाई, मारुती घोरपडे, मलिक कुमार बुरूड, दशरथ अमृते, जितेंद्र टोपले, राजेंद्र सावंत, अनिल फडके, लक्ष्मण गुडुळकर, संचालिका सुनीता रेडेकर, विजयालक्ष्मी देसाई, संचालक आनंदा गवळी, तानाजी देसाई,विलास नाईक, प्रा. कार्यकारी संचालक प्रकाश चव्हाण,
कामगार युनियन सदस्य,
अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
