Homeकोंकण - ठाणेआम्ही विश्व लेखिका कवयित्रींच्या मुखातून बरसल्या पाऊसधारा.- ऑनलाईन 'पाऊस' या काव्य महोत्सवात'...

आम्ही विश्व लेखिका कवयित्रींच्या मुखातून बरसल्या पाऊसधारा.- ऑनलाईन ‘पाऊस’ या काव्य महोत्सवात’ ‘सरिवर सरी ‘

आम्ही विश्व लेखिका कवयित्रींच्या मुखातून बरसल्या पाऊसधारा.- ऑनलाईन ‘पाऊस’ या काव्य महोत्सवात’ ‘सरिवर सरी ‘

कोल्हापूर. प्रतिनिधी. २२

पावसाळा सुरु झाला नी कविंच्या भावनिक अंतराला उभारी आली. संवेदनशील मनं ओल्याचिंब पावसाच्या जिव्हाळ्यावरून भिरभिरू लागली.अशातच “आम्ही विश्व लेखिका” च्या वतीने आयोजित ऑनलाईन ‘पाऊस’ या काव्य महोत्सवात’ ‘सरिवर सरी ‘ मध्ये देश विदेशातून धुव्वाधार शेकडो काव्यधारा बरसल्या.एका अनोख्या काव्यसंम्मेलनाने सारी भारावून गेली आणि पावसाच्या सरीबरोबर कवितांच्या या पाऊसधारा या मनाच्या धरतीवर अविश्रांत बरसत राहील्या.
‘नेहमीच येतो पावसाळा’ म्हणून पावसा कडे दुर्लक्ष न करता त्याच्या आगमनाच्या स्वागतार्थ ‘आम्ही विश्व लेखिका ‘ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पाऊस काव्य महोत्सव विशेष लक्षवेधी ठरला. या पावसाने सारे औदासीन्य  घेऊन जावे आणि चैतन्य निर्माण करावे”,अशा मनोगतासह संस्थेला शुभेच्छा देत ज्येष्ठ कवी आरती प्रभू यांच्या सुकन्या सुप्रसिद्ध कवयीत्री हेमांगीताई नेरकर मुंबई यांनी  ‘मेघा रे मेघा’ ही कविता सादर केली.
“उदघाटक म्हणून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी  डॉ.राजाभाऊ धर्माधिकारी यांनी राजाभाऊंचा भन्नाट विनोदी किस्सा सांगत, पावसाची कविता सादर करत, काव्यमहोत्सवाचे उद्घाटन केले. याप्रसंगी ते म्हणाले की-
“स्वर्गीय मोहन कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या संस्थेद्वारे सर्व लिहित्या स्त्रिया एकत्रित आल्या ..आणि स्त्रियांना संधी दिली तर त्या काय करू शकतात ..?याचे उत्कृष्ट उदाहरण मराठी साहित्याला ही घालून दिले.स्त्री ही एक अदभूत शक्ती असून ती सर्व क्षेत्र काबीज करू शकते. त्यात आपला एक अमीट असा ठसा  निर्माण करू शकते, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे “आम्ही विश्व लेखिका” ही संस्था होय.
आम्ही विश्व लेखिकाच्या अध्यक्षा प्रा. पद्माताई हुशिंग यांनी  प्रभावी प्रास्ताविक सादर केले. संस्थेच्या एकूणच सोनेरी वाटचालीचा आढावा घेतांना त्या म्हणाल्या की, “स्वर्गीय मोहन काका कुलकर्णी यांनी आम्हा स्त्रियांना फक्त लिहीतेच केले नाही  तर आमच्यावर एक जबाबदारी ही टाकून गेले. त्या जबाबदारीला पेलताना आम्ही सातत्याने नवनवीन  साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करून “आम्ही विश्व लेखिकां” च्या सदस्य लेखिकांना विविध प्रकारे साहित्याचा आनंद देण्याचा प्रयास करीत असतो. खरं तर कोरोना मुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन च्या काळात सर्वत्र भीषण वातावरण पसरलेले असताना “आम्ही विश्व लेखिके” ची निर्मिती होऊन वेगाने घोडदौड सुरू आहे.हा एक चमत्कारच आहे अर्थात या सर्वांचे श्रेय सर्व पदाधिकारी, सदस्य आणि समाजालाही जाते. त्यातूनच आजचे ही आयोजन घडलेले आहे.”  या आयोजनाची नेमकी भूमिका सादर करतांना उपाध्यक्ष प्रा.विजया मारोतकर म्हणाल्या की एक कार्यक्रम आटोपला की पुढचा कार्यक्रम काय घ्यावा..? याबाबतचे नियोजन सततच आमच्या मनात सुरू असते ,या वर्षीचा पाऊस  हा नेहमी पेक्षा नक्कीच वेगळा आहे.
कोरोनाने समाजामध्ये एक भयावह आणि उदास वातावरण निर्माण केलेले आहे, हे औदासिन्य धुवून टाकण्याचे सामर्थ्य केवळ पावसातच आहे ,म्हणून या पावसाने काल पर्यंतच्या  सोसलेल्या भयावह दुखा:च्या खुणा पुसून टाकाव्यात. अशी अपेक्षा या पावसाचा कडून आहे.त्यादृष्टीने पावसाचे कविसंमेलन होणे नितांत गरजेचे होते .आमच्या संस्थेत अतिशय सुरेख काव्य लिहीणाऱ्या
कवयित्री आहेत. त्यांच्या पाऊस कविता या संमेलनात सादर व्हाव्यात,या  संकल्पनेतून ‘सरीवर सरी’ चे आयोजन करण्याचे ठरले. दोन दिवसीय या आयोजनाला तेवढ्याच तोलामोलाचे मान्यवर लाभावे असे वाटत होते.त्यानुसार सारेच  मना सारखे घडत गेले आणि सहजच कार्यक्रम उभा राहिला. काव्य महोत्सवाच्या अध्यक्ष हेमांगी ताई नेरकर, उद्घाटक डॉ. राजाभाऊ धर्माधिकारी, कवी संमेलन अध्यक्ष डॉ.शोभाताई रोकडे आणि विशेष अतिथी मोरेश्वर निस्ताने हे चारही मान्यवर या आयोजनाचे चार स्तंभ ठरले. त्यामुळे हा महोत्सव दीर्घकाळ स्मरणात राहील इतका उंचीवर गेलेला आहे ,यात मुळीच शंका नाही.” अशाप्रकारे आपली भुमिका काव्यमय रित्या स्पष्ट केली.
सकाळी दहा वाजता सुरु झालेल्या या उद्घाटनानंतर दिवसभर कविंच्या जाणीवेचा पाऊस कोसळत राहिला.
दिनांक २० जून या दुसऱ्या दिवशीच्या प्रथम सत्र कवी संमेलनांचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध कवयित्री डॉ.शोभाताई रोकडे,अमरावती यांनी स्वीकारले.आपल्या मनोगतात त्या म्हणाल्या की,”आम्ही विश्व लेखिका” संस्थेच्या अध्यक्षा पदमाताई हुशिंग आणि उपाध्यक्ष विजयाताई मारोतकर या दोघींनी अल्पावधीत प्रचंड परिश्रमाने उभी केलेली ही संस्था आज सर्वांना अचंबित करित आहे. स्वतः सोबत इतर लेखिकांना पुढे नेण्याबाबत मनात असलेला ध्यास व प्रत्यक्ष कार्य करण्याची  त्यांची ऊर्जा मी जवळून पाहिलेली आहे.अशा शब्दात उपक्रमाचे आणि आयोजनाचे कौतुक केले .विजयाताई मातोरकर यांनी
अतिशय सुरेख असे हे भाषण करून संस्थेला शुभेच्छा देत….
“पाऊस वाहतो
ढगांच्या पखाली
विजेच्या मशाली चेतवून”
असे नितांत उंचीचे पावसाचे काही अभंग काव्य सादर केले .
मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध पार्श्‍वगायक आणि संगीतकार श्री.मोरेश्वर निस्ताने,नागपूर यांनी विशेष अतिथी पद स्वीकारले.ते म्हणाले की,” अल्पावधीत नावारूपाला आलेल्या ‘आम्ही विश्व लेखिका’ या संस्थेचे कार्य नजरेत भरण्यासारखे आहे. मराठी साहित्यातील ही एक अतिशय  कठीण,महत्त्वाची आणि
मराठी विश्वातील मोठी घटना आहे . मराठीतील प्रथितयश साहित्यिक महिलांची ही संघटना म्हणजे एक अदभूत शक्ती होय, असे मला वाटते.” असे म्हणत त्यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला आणि आपल्या सुरेल आवाजात  एक पाऊस गाणे ऐकविले ज्यातील ‘सरीवर सरी’ या शब्दाचे सुरेल पडसाद काव्यमहोत्सवाला व्यापून राहिलेत.
मा.निताताई बोबडे ,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष यांनी सुरेख प्रास्ताविक केले तर मा.माधुरी चौधरी, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष यांनी दोन दिवस बरसणार्या पाऊससरी बाबतची नेमकी भूमिका स्पष्ट केली.
त्यानंतर दिवसभर बहुरंगी पाऊस सरी बरसत राहिल्या.दोन दिवस चाललेल्या पाऊस काव्य महोत्सवात सहभागी कवयित्रींनी स्वरचित कविता व्हिडिओ व्दारे फेसबुक वर सादर केले.
पाऊस काव्य महोत्सवात सादर झालेल्या कवितांचे रंग तरी किती..? भौगोलिक पातळीवर अगदी ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंतच नव्हे तर मलेशिया, अमेरिका ,इंग्लंड, जर्मनी पर्यंतचा पाऊस बरसून गेला .यामध्ये सर्वच भाषांचे प्रातिनिधित्व मराठीला धरुन साकारले गेले.स्त्री जन्माला शृंगाराने सजवणारा पाऊस तिच्या सर्वच अलंकारातून पाझरला..जो कधी कानातील कर्णफुले , कधी केसांचा गजरा, कधी गळ्यातील मोहन माळ, कधी हातातील क्ंकण तर कधी पायातील पैंजणा पर्यंत बरसुन गेला .निसर्गातील सारीच्या सारी रुपे कधी निर्झर ,कधी नदी,कधी सागर तर कधी धबधबा होऊन कोसळला.
मेघा तू मनमुराद बरस . तुझ्यासारखंच माझं मनही गहिवरुन आलं आहे असा कवयित्रींच्या मनातला पाऊस कधी बालरूप झाला कधी ,तरुणीच्या प्रेमाचा सुगंध झाला, कधी स्त्रीच्या जगण्यातील वेदना झाला तर कधी शेतकऱ्याचा आधारवड झाला .अशा विविधांगी बरसलेल्या पाऊस सरींनी आपली वेगळीच प्रतिमा उमटवली.
“पावसाच्या आल्या सरी
आशा मनात पालवली
काळ्या मातीत तिफन
बळीराजाने रेखली “
अशा सुरेख ओळी चैतन्य  निर्माण करुन गेल्या तर..
आला पाऊस पाऊस,
तृषार्त धरणी ची
पूरी जाहली
चिंब होण्याची हौस.
“पावसा तू येतोस पण छळतोस खूप आठवणीतील कोणीतरी जपतोस खूप’
असच मनातलं शांत जग जागवून गेला.. असाही पाऊस बरसून गेला.कोणी मृग नक्षत्रा पासून पावसाची सारीच नक्षत्रे सांगून गेल तर कोणी पावसाच्या मनात शिरून त्याची व्यथा मांडली तर वैचारिक पाऊसही बरसला ज्यामध्ये पावसाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान ही साकारले
तर क्रांती ज्योती सावित्री आईच्या ओळीतून ही बरसणारा पाऊस सांगून गेला …
“थेंबाथेंबातून पाझरली अक्षरे
वाक्यांचा उत्सव केलास तू
सरीवर सरी बरसल्या शब्दांच्या क्रांतीज्योती ठरलीस तू”
असा सावित्रीचा पाऊसही बरसून गेला एकूणच पावसाच्या विविधांगी सरीवर सरी न्याहाळताना रसिक श्रोते निव्वळ चिंब भिजलेच नाही तर अचंबित ही झालेत.एकापेक्षा एक सुरेख अशा कविता सादर करत संपूर्ण महाराष्ट्र,गोवा,मलेशिया,अमेरिका,जर्मनीयेथून शेकडो कवयित्रीनी आपला सहभाग नोंदविला. अल्पावधीतच दोन हजारच्या पुढे सदस्य संख्या गाठणाऱ्या “आम्ही विश्व लेखिका” च्या ‘सरीवर सरी’ ने सर्वांनाच काव्य पावसामध्ये चिंब केले.
विदर्भाच्या अकराही जिल्ह्यातील कवयित्रींनी आपला सहभाग नोंदवला. अकोला येथून देविकाताई देशमुख, डॉ. अनघा सोनखासकर ,साधना काळबांडे, वाशिम जिल्ह्यातील मंगला नागरे, भारती भोरे ,राधा मुरकुटे यांनी सुरेख काव्यरंग भरला. अमरावती येथील अलका देशमुख, शिल्पा ढोक, रश्मी कुळकर्णि,
विजया कडू, विजया भांगे यांनी भावस्पर्शी काव्य रचना सादर केल्या तर वर्धा येथील जयश्री कोटगीरवार,माया रंभाळे ,मंजुषा चौगावकर, प्रीती वाडीभस्मे यांच्या विविध काव्यसरी रिमझिम बरसल्या.
नागपूर येथून अंजली टाकळीकर, अंजली वेखंडे ,निशा खापरे, ज्योती बनसोड, मीनल येवले ,हेमा नागपूरकर, स्वाती सूरंगळीकर यांनी भावगर्भ पाऊस
कविता सादर केल्या.
कोल्हापुर जिल्हा शाखेने ही आपला सहभाग नोंदविला. डाॅ.ज्युबेदा तांबोळी ,डाॅ.संजीवनी तोफ़खाने .जिल्हाध्यक्षा.उर्मिला पांगम ,अध्यापिका कांचन बाबर ,शामली भगत. इ. कवयित्रिंनी आपल्या विविध रंगी कवितांतून पाऊस चितारला.
स्मिता भट,यवतमाळ आणि नंदा देवडीकर,पुणे
यांनी स्वागत गीत सादर केले.
सुप्रसिद्ध कवयित्री निशा डांगे,यवतमाळ जिल्हा अध्यक्ष यांनी दोन्ही दिवसांचे सुरेख सूत्रसंचालन करून काव्यमहोत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले.कविता पुदाले,उस्मानाबाद यांनी तंत्र सहाय्यक म्हणून भूमिका पार पाडली तर तंत्र समितीतील
अश्विनी निवर्गी, शुभांगी दळवी,
अस्मिता चौधरी,उज्वला इंगळे यांनी ही मनापासून सहकार्य केले.
“आम्ही विश्व लेखिका”चाब
‘सरीवर सरी’ हा पहिलाच काव्य महोत्सव नितांत अविस्मरणीय असा ठरलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.