Homeकोंकण - ठाणेकोकणात राज ठाकरेंची भाजपला साथ नाही.- मनसेकडून 'पदवीधर'साठी अभिजित पानसे..

कोकणात राज ठाकरेंची भाजपला साथ नाही.- मनसेकडून ‘पदवीधर’साठी अभिजित पानसे..

🟥कोकणात राज ठाकरेंची भाजपला साथ नाही.- मनसेकडून ‘पदवीधर’साठी अभिजित पानसे..

ठाणे :- प्रतिनिधी.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा देत महायुतीच्या सभांमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाकडून अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करुन सोमवारी भाजपला धक्का दिला.
🔴या मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे हे आमदार असून सलग तिसऱ्यांदा ते निवडणुक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. असे असताना मनसेकडून पानसे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही खळबळ उडाली असून राज यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी महायुतीच्या गोटात प्रयत्न सुरु झाल्याची चर्चा आहे.
🟥कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. २०१२ मध्ये निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातून पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तत्कालिन आमदार संजय केळकर यांचा पराभव करत पहिल्यांदा भाजपच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. २०१८ मध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या आधी त्यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने त्यांना लगेचच या मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर झाली. या निवडणुकीत तेव्हाच्या एकसंघ शिवसेनेचे उमेदवारी आणि ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांचा त्यांनी पराभव केला. त्यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातून नजीब मुल्ला हेदेखील डावखरे यांच्याविरुद्ध रिंगणात होते. या तीन ठाणेकर उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीत डावखरे यांनी पाच हजारांपेक्षा अधिक मतांनी मोरे यांचा पराभव केला. यानंतर गेले सहा वर्ष निरंजन या मतदारसंघात बांधणी करत आहेत. पदवीधर मतदारांची नोंदणी करणे, कोकण पट्टयातील शिक्षण संस्थांसोबत संपर्क ठेवणे तसेच याच भागातील सर्वपक्षीय नेत्यांच्या संपर्कात राहून निवडणुकीसाठी आवश्यक असलेला संपर्क प्रस्थापित करण्यात निरंजन यांचा हातखंडा राहीला आहे. राज्यातील बदलेल्या राजकीय समिकरणांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची अतिरीक्त मदत यावेळी निरंजन यांनी गृहीत धरल्याने हा मतदारसंघ भाजपसाठी सोपा राहील असे तर्क लढविले जात असताना राज ठाकरे यांनी अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करुन महायुतीच्या गोटात मिठाचा खडा टाकल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
🔴लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा देत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात मनसैनिकांना उतरविले होते. मुंबई, ठाण्यात राज यांच्या पक्षाची रसद महायुतीच्या उमेदवारांमागे उभी करण्यात भाजपला काही प्रमाणात यश आल्याचे दिसले. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेच्या उमेदवारांसाठी मनसेचे अविनाश जाधव, अभिजीत पानसे हे नेते पुर्ण ताकदीने प्रचारात दिसले. ठाण्यात नरेश म्हस्के यांच्या प्रचाराची मोठी जबाबदारी पानसे यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. कधी नव्हे ते या काळात टेंभी नाका येथील आनंद मठीत मनसे नेत्यांचा वावर दिसू लागला होता. भाजप, शिवसेना आणि मनसेचे सुत उत्तम जुळले असल्याचे चित्र एकीकडे दिसत असताना सोमवारी कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरे यांनी अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करत भाजपला धक्का दिला. या मतदारसंघातून पुन्हा निवडणुक लढविण्याची पुर्ण तयारी निरंजन डावखरे यांनी केली आहे. असे असताना महायुतीतील नेत्यांची चर्चा करण्यापुर्वीच राज यांनी येथून पानसे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. सोमवारी सकाळी उमेदवारी जाहीर होताच सायंकाळी नौपाडा येथील पक्षाच्या कार्यालयात अविनात जाधव आणि अभिजीत पानसे यांनी पत्रकारांशी संवाद साधत आम्ही कामाला सुरुवात केल्याचे जाहीर केले.

🔴फक्त लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा?

दरम्यान, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून देण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं होतं. मात्र, हा पाठिंबा फक्त लोकसभेसाठी होता की आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्येही राज ठाकरे महायुतीसोबत दिसतील, यावर चर्चा सुरू झाली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात पानसेंच्या उमेदवारीनंतर दुसरीकडे भाजपाकडूनही या मतदारसंघाचा आग्रह धरून डावखरेंच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जर दोन्ही पक्षांमध्ये एकमत न झाल्यास कोकण पदवीधर मतदारसंघासाठी लोकसभेच्या मित्रपक्षांमध्ये उभा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

🟥निरंजन डावखरे दोन वेळा विजयी.

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे निरंजन डावखरे हे दोन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे याहीवेळी त्यांचा या मतदारसंघावर दावा निश्चित मानला जात होता. पण मनसेनं जाहीर केलेली पानसेंची उमेदवारी आणि लोकसभा निवडणुकीत मनसेचा महायुतीमध्ये झालेला समावेश यामुळे या मतदारसंघातली समीकरणं नव्याने जुळवली जाऊ शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे निरंजन डावखरेंना इथून उमेदवारी नाही तर मग काय मिळणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यांना ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळू शकते, असंही बोललं जात आहे.
🔴येत्या २६ जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी मतदारनोंदणी झाली असून आता अभिजीत पानसेंच्या उमेदवारीमुळे मनसेकडून जोर लावला जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळात मनसेकडून लढवण्यात येणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या उमेदवारीच्या घोषणेमुळे मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.