🛑गुजरात सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका,- दोषींच्या माफीचा निर्णय रद्द. 👇
🛑गडहिंग्लजमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांना वाटप केली नियुक्तीपत्र ( गडहिंग्लज येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश.👇)
गुजरात.- वृत्तसंस्था

गुजरातमधील बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. न्यायालयाने दोषींच्या माफीचा निर्णय रद्द केला आहे. गुजरात सरकारला शिक्षा माफ करण्याचा अधिकार नव्हता, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. यामुळे गुजरातमधील भाजपा सरकारला मोठा धक्का बसला असून न्यायालयाच्या निकालामुळे दोषींना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. गुजरातमधील दंगलीवेळी बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 11 दोषींना गुजरातमधील भाजप सरकारने 15 ऑगस्ट 2022 ला तुरुंगातून सोडले. या दोषींची शिक्षाही माफ केली. यामुळे देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटली. गुजरात सरकारच्या निर्णयानंतर बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दोषींना पुन्हा तुरुंगात डांबावे, अशी मागणी बिल्किस बानो यांनी केली. यावर न्यायमूर्ती बी. न्यायमूर्ती व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमर सुनावणी पार पडली.
11 दिवसांच्या सुनावणीनंतर दोषींच्या शिक्षेच्या माफीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज निर्णय देण्यात आला. न्यायालयाने दोषींच्या माफीचा निर्णय रद्द केला असून हत्येचा आरोप असलेल्या दोषींनी 2 आठवड्यात आत्मसमर्पण करावे असे निर्देश दिले.
सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
हा गुन्हा जरी गुजरातमध्ये घडला असला, तरी बिल्किस बानो यांच्या मागणीवरून हा खटला मुंबईत ट्रान्सफर करण्यात आला होता. महाराष्ट्रात या प्रकरणी आरोपींवर खटला चालून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे गुजरात सरकारला आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. त्यामुळे, या प्रकरणात निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येतो. त्यामुळेच गुजरात सरकारने या 11 आरोपींची शिक्षा माफ करण्याचा घेतलेला निर्णय रद्द ठरवला जातो, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.
🟪11 दोषींची नावे
जसवंत नाई, गोविंद नाई, शैलेश भट्ट, राधेश्याम शहा, बिपिन चंद्र जोशी, केसरभाई वोहनिया, प्रदीप मोर्दहिया, बकाभाई वोहनिया, राजुभाई सोनी, मितेश भट्ट आणि रमेश चंदना.
🛑गडहिंग्लजमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांना वाटप केली नियुक्तीपत्र ( गडहिंग्लज येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश.)
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

गेली दहा वर्षे केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जागतिक पातळीवर भारताची मान उंचावली. त्यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजप व मित्र पक्षांचे सरकार पुन्हा सत्तेत येऊन मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. असा विश्वास शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला. येथे गडहिंग्लज तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांना निवड पत्र वाटपवेळी ते बोलत होते.
श्री.घाटगे पुढे म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय यशस्वीपणे घेतले आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या आहेत.त्याचा लाभ समाजातील सर्व घटकांना पारदर्शकपणे दिला आहे. या योजना व सरकारची दहा वर्षातील कामगिरी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी काम करावे.
यावेळी निवड पत्रे वाटप केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे अशी.
सरचिटणीस-अजित जामदार,उपाध्यक्ष-अमित देशपांडे, संतोष पाटील, वसंत पोवार, द्राक्षायणी घुगरी,चिटणीस-सचिन कळेकर, रमेश दड्डीकर, तात्यासो देसाई, बाळकृष्ण शिंदे, कोषाध्यक्ष-विश्वनाथ खोत,महिला मोर्चा तालुकाध्यक्षा-अॕड परमेश्वरी पाटील,शहराध्यक्षा नीलांबरी भुईम्बर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष-प्रताप मोहिते,शहराध्यक्ष संग्राम हासबे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष – मानसिंग जाधव, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष-नंदकुमार गुरव, अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष- वामन बिलावर, शहराध्यक्ष राजेश घोडके, युवती मोर्चा तालुकाध्यक्षा – प्रतिभा पाटील यावेळी भाजपचे शहर व ग्रामीणचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते. स्वागत जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे यांनी केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे यांनी केले. आभार शैलेश कावणेकर यांनी मानले.
चौकट
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश.
यावेळी गडहिंग्लजमधील विनायक डोणवाडे, अमर रावळ, कार्तिक रावण, विनायक कौजलगी, अवधूत गुंडप, सुशांत सोलापुरे, मनोज पोतदार या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. श्री घाटगे यांनी त्यांचे स्वागत केले.
