संकेश्वर-बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा २९ डिसेंबर रोजी आंदोलनाचा इशारा.🛑
आजरा.- प्रतिनिधी.

खेडे ता. आजरा येथील हनुमान मंदिर येथे संकेश्वर -बांदामहामार्ग बाधित शेतकर्यांची आज दि.१६ रोजी बैठक झाली. या बैठकीत दि.२९ डिसेंबर रोजी तहसील कार्यालय आजरा येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे. मागील दि.१२ ऑक्टोबर २०२३ रोजी आजरा तहसील कार्यालयासमोरील आंदोलनाच्या वेळी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या सोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप बैठक झाली नाही ती बैठक तात्काळ आयोजित करावी.शिवाय खाजगी जमिनी संपादन करताना २०१३ च्या भूमी संपादन कायद्याप्रमाणे एन्.ए दराच्या रेडी रेकनरच्या पाचपट दराने दर निश्चित केल्याशिवाय कोणतेही महामार्गाचे काम करू नये, अशी मागणी आहे. त्यामुळे महामार्गाचे चालू काम बंद करण्यात यावे, तसेच नागपूर येथील अधिवेशनावर नुकताच दि.१३ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्रातील महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा महामोर्चा काढण्यात आला; यावेळी माननीय बांधकाम मंत्री दादा भुसे साहेब व महसूल मंत्री विखे पाटील साहेब यांनी मुख्यमंत्री यांचे सोबत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे. सदर बैठकीमधून राज्य पातळीवर सर्व महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्यासाठी योग्य तो निर्णय होईलच तोपर्यंत भूसंपादनाची मनमाने पैशाची नोटीस काढण्यात येऊ नये अशा योग्य दर न ठरवता सरकारने काढलेल्या नोटिसा महामार्गामुळे बाधीत होणार्या शेतकरी, घरमालक, व्यापारी इ. कडून स्वीकारल्या जाणार नाहीत असा ठराव आज झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे.मागील आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचे इतिवृत्तांतामध्ये काही मुद्दे आलेच नाहीत .त्याची दुरुस्ती करून इतिवृत्त तयार करून देण्याचे ठरले असताना सुद्धा महामार्गाचे अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे ते इतिवृत्त चर्चेतील सर्व मुद्द्यासह देण्यात यावे. शेतकऱ्यांची रस्ता बांधकामाची सर्व माहिती संघटनेला देण्यात यावी. तसेच रस्ता बांधणाऱ्या कंपनीसोबत सरकारने केलेल्या कराराची प्रत संघटनेला देण्यात यावी. रस्त्याच्या दुतर्फा बळजबरीने जमिनी घेऊन महामार्ग बनवला आहे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या रस्ता रुंदीकरणासाठी वापरलेल्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा, सर्व लगत धारक शेतकऱ्यांच्या नावे असणाऱ्या जमिनीचे मोजमाप करण्यात यावे.
जर अशा शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही तर बांधा वापरा व हस्तांतरण करा या तत्त्वावर कंपनी ज्यावेळी टोल वसुली करेल त्यामध्ये मिळणाऱ्या पैशातील वाटेकरी हे संकेश्वर- बांधा महामार्ग लगत धारक शेतकरी राहतील ही जाहीर मागणी शेतकऱ्यांची आजच्या बैठकीत करण्यात आली. याची नोंद सरकारने घ्यावी. खाजगी वाटाघाटीने जमीन संपादन करण्यात येऊ शकतात याची सर्व जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांचीच आहे. तसेच अधिवेशनातील बैठकीचे सर्व वृत्तांत यावेळी देण्यात आला. सदर बैठकीसाठी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत शिवाजी इंगळे, अनिल शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अण्णासो पाटील, दिगंबर होरंबळे ,आनंदा येसणे ,आनंदा खोराटे यांनी यावेळी अनुभव कथन केला. सचिन देशपांडे, शिवाजी डोंगरे, कांचन बेळगुंडकर, लता मोरबाळे, शिवाजी देसाई, अशोक लकांबळे, रवी बेळगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते आभार कॉम्रेड. गणपतराव येसने यांनी मानले.

