जेष्ट साहित्यिक – कवी नाटककार लेखक.- प्रा. राजा शिरगुप्पे यांचे निधन.
आजरा.- प्रतिनिधी.
ग्रामीण भागापासून महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन राज्यांत साहित्याचा वसा जपणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे यांचे मंगळवारी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान येथे निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे चळवळीतील बिनीचा कार्यकर्ता व चळवळीत हजारो कार्यकर्ते तयार करणारे नेतृत्व हरपल आशा भावना व्यक्त होत आहे. निपाणी तालुक्यातील शिरगुप्पी गावात त्यांचा अंत्यविधी झाला.
सीमाभागातील निपाणी गावचे शिरगुप्पे हे आजरा येथे गेली अनेक वर्षे वास्तव्यास होते. त्यांनी कथा, कविता, नाटक, चित्रपट, पथनाट्य, समीक्षालेखन आदी साहित्याच्या प्रांगणात आपला ठसा उमटवला.
बालसाहित्य ते विद्रोही साहित्य चळवळीचे अध्वर्यू असा त्यांचा संचार राहिला. निपाणीतील तंबाखू कामगार चळवळीपासून ते विविध प्रकारच्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. सांगलीत झालेल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
‘न पेटलेले दिवे’, ‘शोध यात्रा ईशान्य भारताची’, ‘शोधयात्रा महाराष्ट्राची’, ‘तिच्या नवऱ्याचे वैकुंठगमन’ यांसह विविध पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले. वाङ्मयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ यांसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. त्यांच्या मागे पत्नी प्रा. मीना शिरगुप्पे, मुलगा चित्रकार रोहन, मुलगी अनुजा, सून असा परिवार आहे.
【 गुरुवार दिनांक 2 रोजी सायंकाळी चार वाजता आजरा येथे गंगामाई वाचन मंदिर या ठिकाणी साहित्यिक राजाभाऊ शिरगुपे यांना श्रद्धांजली वाहनाचा शोकाकुल कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 】
