🛑आजरा साखर २५ व्या गळीत हंगामाचा “बॉयलर अग्नि प्रदीपन होमहवन विधी” समारंभ संपन्न.
🛑माजी खासदार डॉ.निलेश राणे कुरघोडीच्या राजकारणाचे बळी..
( सक्रिय राजकारणातून निवृत्ती.)
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याच्या सन ३०२३/२४ या २५ व्या गळीत हंगामाचा “बॉयलर अग्नि प्रदीपन होमहवन विधी” समारंभ मंगळवार दि.२४ रोजी कारखान्याचे संचालक मधुकर कृष्णराव देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मंगल मधुकर देसाई यांचे शुभहस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी चेअरमन सुनिल शिंत्रे होते. “बॉयलर अग्नि प्रदीपन होमहवन विधी” समारंभ कारखान्याचा बॉयलर मा.प.पू. बसवकिरण स्वामीजी, जडयसिध्देश्वर बिलवाश्रम, गडहिंग्लज यांच्या व संचालक मंडळाच्या उपस्थितीत संपन्न झाला.
स्वागत प्रभारी कार्यकारी संचालक ज्योती व्यंकटेश यांनी केले तर प्रास्ताविक चेअरमन श्री शिंत्रे यांनी केले. यावेळी बोलताना .प.पू. बसवकिरण स्वामीजी म्हणाले आजरा साखर सहकार तत्वावर चालू आहे. बंद झालेला कारखाना पुन्हा सर्वाच्या सहकार्याने चालू झाला आहे. चालू होणाऱ्या गळीत हंगामासाठी कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात ऊस आजरा साखरला घालावा व आपल्या साखर कारखान्याचे चार हजारा पंर्यत उदिष्ट पुर्ण करावे. यासाठी आमचे आर्शिवाद असतील असे प.पू. बसवकिरण स्वामीजी म्हणाले.
यावेळी सर्व संचालक, संचालिका, अधिकारी, कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🛑 माजी खासदार डॉ.निलेश राणे कुरघोडीच्या राजकारणाचे बळी..
( सक्रिय राजकारणातून निवृत्ती.)
मालवण.- प्रतिनिधी.

माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून घेतलेल्या निवृत्तीमुळे ‘ऑल इज नॉट वेल’चे संदेश जात आहेत. निलेश राणे यांनी ऐन विजयादशमीच्या दिवशी सकाळी ट्वीट करून सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, असे ट्विट करून कोकणातील राजकारण घुसळून टाकले आहे. त्यांनी अचानक एवढा मोठा निर्णय ट्वीट करून जाहीर करताना भाजप पक्ष नेतृत्वाशी चर्चा केली होती का, याबाबत नक्की माहिती मिळत नाही. पण निलेश राणे यांनी स्थानिक राजकारणाला कंटाळून सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडील नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांचे आमदार बंधू नितेश राणे भाजपमध्ये सक्रिय आहेत. असे असताना निलेश राणेंनी राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतल्याने अनेक उलटसुलट चर्चा होत आहेत.
निलेश राणे कुणामुळे नाराज?
निलेश राणे २००९ मध्ये खासदार होते. त्यानंतर सलग दोन वेळा ते खासदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाले.आता २०२४ साठी त्यांना आमदारकीचे तिकीट देण्याची चर्चा सुरू आहे. तर लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा यापूर्वीच सुरू झाली आहे.रविंद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असून ते भाजपचे आमदार आहेत. शिवाय ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांनाही लोकसभेचे वेध लागल्याची चर्चा आहे. यात भर पडली आहे ती रविंद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यातील जवळीकीची. या दोघांमधील जवळीक निलेश राणेंना पसंत नसल्याची चर्चा आहे. या सर्व कुरघोडीच्या राजकारणामुळे त्यांनी सक्रीय राजकारणातून काडीमोड घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.
तो त्यांचा निर्णय👉विनायक राऊत
माजी खासदार निलेश राणे यांनी असा टोकाचा निर्णय का घेतला माहीत नाही. कदाचित राजकीय कुरघोडीतून नैराश्य आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असावा. तरीही तो त्यांचा निर्णय आहे, मला त्यावर बोलायचे नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार आणि निलेश राणे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी विनायक राऊत यांनी दिली आहे.
