शाळा बंद करण्याच्या निर्णय मागे घेण्यासाठी जनआंदोलन उभारणार
आजरा येथील मेळाव्यात पालक शिक्षकांचा निर्धार.
आजरा – प्रतिनिधी.
राज्य सरकारने २० पटाखालील शाळा बंद करण्याचे धोरण घेतल्याने राज्यातील पंधरा हजाराहून अधिक शाळा बंद होणार असल्याने या धोरणा विरोधात जन आंदोलन उभा करण्याचा निर्धार दि. ७ रोजी आजरा येथे झालेल्या मेळाव्यात करण्यात आला. यावेळी कॉ संपत देसाई, कॉ संजय तर्डेकर, शिवाजी बोलके, डॉ नवनाथ शिंदे, संभाजी बापट,शिवाजी गुरव, महादेव पवार, निवृत्ती कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला. यावेळी बोलतांना कॉ संपत देसाई म्हणाले की राज्य सरकारने शाळा बंद करण्याचे धोरण घेऊन वाड्यावस्त्यांवरील दलित, आदिवासी, भटके विमुक्त, अल्पसंख्यक समूहासह बहुजन समाजातील कष्टकरी जातवर्गातील मुलांना शिक्षणाच्या प्रक्रियेतून कायमचे हद्दपार करण्याचे ठरविले आहे. शिक्षण हक्क कायद्याचा आधार घेतं त्याच्या आडून आपला छुपा अजेंडा हे सरकार राबवू पाहत आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकरणाऐवजी खाजगीकरणं करू पाहत आहे. याविरोधात तीव्र लढा उभा करूया – कॉ संजय तर्डेकर म्हणाले की शाळा बंद करून आम्हाला सरकार देशोधडीला लावत आहे. याविरोधात सर्वजण एकत्र येऊन नेटाने लढा उभा करूया. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येत्या शनिवारी १४ ऑक्टोबरला आनंदराव नांदवडेकर प्राथमिक शिक्षक पतसंस्था आंबोली रोड आजरा येथे सजग पालक, शाळा व्यवस्थापन समिती व तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा व्यापक मेळावा घेण्याचा निर्णय होऊन त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे. यावेळी युवराज पोवार, शिवाजी गुरव, डॉ नवनाथ शिंदे, निवृत्ती कांबळे, शिवाजी बोलके, संभाजी बापट, एकनाथ आजगेकर डी के कांबळे यांनीही मनोगते व्यक्त केली. सुरवातीला मायकेल फर्नांडिस यांनी प्रास्ताविक केले आभार प्रकाश तिबिले यांनी मांडले. आजच्या मेळाव्याला कृष्णा सावंत, उमाजी कुंभार, रवी दोरुगडे यांच्यासह शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
