‘बाहुबली’ नावावरून वाद चिघळणार? – आंबोली घाटातील ‘या’ धबधब्याला ग्रामस्थांचा विरोध.
( तर शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर येण्याअगोदर पारपोली ग्रामस्थांच्यावतीने श्रीफळ वाढवून धबधब्याचा नूतनीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. )
आंबोली :- प्रतिनिधी.

राज्याच्या पर्यटन विभागाने आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळच्या एका धबधब्याला ”बाहुबली” हे नाव दिल्यावरून वाद निर्माण झाला आहे.आंबोली ग्रामस्थांनी या फिल्मी नावाला विरोध केला.तर पारपोली ग्रामस्थांनी या धबधब्याच्या नूतनीकरण कामाचे उद्घाटन मंत्री दिपक केसरकर यांची वाट न पाहता केले.
आंबोली घाटातील धबधब्याला दिलेल्या ‘बाहुबली’ या नावाबाबत येथील ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. धबधब्यांना चित्रपटातील नावे देऊ नयेत,अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून,याबाबत शालेय मंत्री दीपक केसरकर यांचेही लक्ष वेधणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
आंबोली घाटात अनेक धबधबे आहेत.जवळपास सहा मोठ्या धबधब्यांसह असंख्य लहान धबधबे आहेत. सध्या ‘बाहुबली’ म्हणून गाजणाऱ्या धबधब्यापेक्षा मोठा धबधबा ज्या ठिकाणी दरड पडली, त्याच्या बाजूला आहे. तेथे जागाही विस्तीर्ण असून तो थेट कोसळणारा धबधबा आहे; मात्र याबाबत पर्यटक अनभिज्ञ आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
बाहुबली धबधबा रस्त्यानजीक असून, त्याचे अचानक उद्घाटन करण्यामागे कारण काय, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. आंबोली घाटातील धबधब्यांना नावे देण्याची गरज नसून, त्याला ग्रामस्थांचा विरोध आहे, अशी माहिती देण्यात आली.यावेळी प्रमुख गावकरी शशिकांत गावडे, शिवसेना उपसंघटक विशाल बांदेकर, सदस्य महेश पावसकर, काशिराम राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष उल्हास गावडे, संतोष पालेकर आदी ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. ग्रामपंचायतमध्येही तसा ठराव घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
पारपोली ग्रामपंचायतच्या हद्दीत हा धबधबा येत असताना ग्रामपंचायतीला विश्वासात घेतले नाही. पारपोली ग्रामस्थांनी लावलेला स्वागताचा बॅनरही फाडण्यात आला, असा आरोप करत याचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी पारपोली सरपंच कृष्णा नाईक, उपसरपंच संदेश गुरव, सदस्य प्रियांका गुरव, माजी उपसरपंच प्रमोद परब, हेमंत गावकर, दत्ताराम गावकर, दीपक पास्ते, विनायक गावकर, सोपान परब आदी उपस्थित होते.
