⭕कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक,- जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार…….निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ⭕ संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा- – मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन……
मुंबई, = प्रतिनिधी.
राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. विहीत कालावधीत ही समिती अहवाल देईल.
निवृत्तीनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य करण्यात आल्याचे सांगतानाच संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा,
असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विधीमंडळातील मुख्यमंत्री समिती कक्षात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक घेण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री
श्री. फडणवीस,
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार,
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,
मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,
वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक,
अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघाचे उपाध्यक्ष विश्वास काटकर यांच्यासह चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघ,
शिक्षक भारती,
जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद युनियन,
विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटना,
माध्यमिक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना,
जुनी पेन्शन संघटना, महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना,
प्राथमिक शिक्षक संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले,
राज्याच्या विकासात कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्वाचा आहे.
लोकप्रतिनीधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत.
त्यामुळे जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी या मागणीच्या मागे जे तत्व आहे त्या विरोधात सरकार नाही.
यातून मार्ग काढण्याची मानसिकता सरकारची आहे. अधिकारी-कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांची सामाजिक सुरक्षा जोपासण्यासाठी चर्चेतून मार्ग काढला जाईल.
यासंदर्भात प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांची समिती नेमली जाईल.
ही समिती कालबद्धरित्या अहवाल सादर करेल,
असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
ज्या राज्यांनी ही जुनी निवृत्ती योजना लागू केली आहे, त्याबाबत त्यांचा रोडमॅप अद्यापही तयार नाही.
या योजनेबाबत राज्य शासन जे धोरण स्विकारेल त्यात याआधी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे नुकसान होवू देणार नाही.
राज्य शासन कोणतीही अडेल भूमिका घेणार नाही आणि कर्मचाऱ्यांनीही घेवू नये,
असे सांगत कर्मचारी संघटनांनी चर्चेत मार्ग काढण्यासाठी सहकार्य देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.
यावेळी श्री. काटकर यांनी संपाबाबत आणि जुन्या निवृत्ती योजनेबाबत मुद्दे मांडले.
