राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी.- पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ करणार सुनावणी.
मुंबई. – प्रतिनिधी.
राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची रचना जाहीर करण्यात आली आहे. न्या. मा.धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ महाराष्ट्राच्या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. आज सकाळी साडे दहा वाजता या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे. 23 ऑगस्टला याप्रकरणाची शेवटची सुनावणी झाली होती. मात्र, त्यानंतर या सुनावणीबाबत सातत्याने पुढील तारखा देण्यात आल्या. परंतु, आता यावर आज सुनावणी सुरू होत असल्याने या प्रकरणाची दिशा स्पष्ट होणार आहे.
11 मुद्द्यांवर पाच न्यायाधीशांचे खंडपीठ निर्णय देणार
शिवसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील कार्यवाही लांबवली जात असल्याचा आरोप करत घटनापीठापुढील सुनावणीसाठी शिंदे गटाने काल मंगळवारी सरन्यायाधीशांना विनंती केली होती.या प्रकरणी जवळपास 11 मुद्द्यांवर हे पाच न्यायाधीशांचे खंडपीठ निर्णय देणार आहे. आज निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत सुप्रीम कोर्टाची भूमिका ठरण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर हे घटनापीठ नियमित कधीपासून कामकाज करणार हे स्पष्ट होईल. सुप्रीम कोर्टाचे बेंच ठरले असून पाच न्यायाधीशांसमोर सत्ता संघर्षाची सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती उदय लळीत यांनी पाच सदस्य खंडपीठाचे गठन केले आहे. हे पाच सदस्यीय खंडपीठ आज सकाळी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या याचिकांवर सुनावणी करेल.
➖1.न्या. धनंजय चंद्रचूड
➖2.न्या.एम आर शहा
➖3.न्या. कृष्ण मुरारी
➖4.न्या.हिमाकोहली
➖5. न्या. पी नरसिंहा
सरन्यायाधीश उदय लळीत या घटनापीठात सामील नाहीत
माहितीनुसार, सध्याचे सरन्यायाधीश उदय लळीत या घटनापीठात सामील झालेले नाहीत, सरन्यायाधीश उदय लळित यांचा कार्यकाळ 8 नोव्हेंबरपर्यंतच असून त्यादिवशी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांनी या घटनापीठात स्वतःचा समावेश केला नसावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
16 आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसाठी नोटीस.
सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसाठी तत्कालीन विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस देण्यात आली होती, या नोटीसीला यानंतर आव्हान देण्यात आले होते, या दरम्यान शिवसेना आणि शिंदे गटात विविध कायदेशीर विवाद निर्माण झाले. यावरील सुनावणी प्रलंबित आहेत.
