कॉंग्रेसच्या अवस्थेवर शिवसेनेचं प्रश्नचिन्ह.- राहुल गांधीना केलं लक्ष
मुंबई :- प्रतिनिधी.
महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असलेले शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे पक्ष अधूनमधून परस्परांवर टीका-टिप्पणी करत असतात. मात्र, इतर पक्षांच्या अंतर्गत बाबींवर बोलणं टाळलं जातं. शिवसेनेनं मात्र पुन्हा एकदा काँग्रेसच्या अवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळं या दोन्ही पक्षामध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांपासून कमकुवत झालेल्या काँग्रेसला उभारी देण्यासाठी उदयपूर इथं नुकतंच चिंतन शिबीर पार पडलं. हे शिबीर होत असतानाच पंजाबमध्ये सुनील जाखड व गुजरातमध्ये हार्दिक पटेल या दोन मोठ्या नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. हाच धागा पकडून शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेसच्या अवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. नेते सोडून जात असल्याबद्दल शिवसेनेनं अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांना जबाबदार धरलं आहे. त्यासाठी काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांच्या वक्तव्यांचा आधार घेतला आहे.
‘राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात अनेक प्रश्न अधांतरी सोडले. त्याच कारणास्तव राज्या-राज्यांतील अनेक नेते काँग्रेस सोडताना दिसत आहेत,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे. ‘मोदी व त्यांचा पक्ष वेगळ्या पद्धतीनं २०२४ ची करीत असताना काँग्रेसमधील ‘गळती’ हंगाम सुरूच आहे आणि त्या पक्षाची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. संसदीय लोकशाहीसाठी हे चित्र बरं नाही. जाखड, हार्दिक यांच्यानंतरही ठिगळे वाढतच जाण्याची भीती आहे. ही भोके शिवणार कशी?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.
‘तरुणांना काँग्रेस पक्षात आपलं भविष्य दिसत नसेल तर कसं होणार? आज काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नाही व उदयपूरच्या चिंतन शिबिरात त्यावर चर्चा झाली, पण नेतृत्वाचा प्रश्न अधांतरी ठेवून चिंतन शिबीर संपवलं गेलं. ज्या राज्यांत आता निवडणुका आहेत, त्या राज्यांत जनसंपर्क असलेल्या नेत्यांना तरी काँग्रेसनं सांभाळलं पाहिजे. काँग्रेसनं देशभर ६५०० पूर्णवेळ कार्यकर्ते नियुक्त करण्याचा निर्णय घेतला, पण उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांना प्रदेशाध्यक्ष नाहीत. या दोन मोठ्या राज्यांच्या नेतृत्वाशिवाय उदयपूरचे चिंतन शिबीर झाले,’ याबद्दलही शिवसेनेनं खंत व्यक्त केली आहे.
