भीमा नदीवर प्रत्येकी १२ टीएमसी पाणी साठवण क्षमतेचे ९ बॅरेजेस निर्माण करणार जलसंपदा मंत्री जयंत पाटील.
( जलसंपदा विभागात आउटसोर्सिंग द्वारे १४ हजार पदांची भरती करणार )
सोलापूर : – प्रतिनिधी.
जिल्ह्यातील सर्व नद्यांवर मोठ्या क्षमतेचे बॅरेजेस बांधण्याचे नियोजित असून पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर प्रत्येकी बारा टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेले ९ बॅरेजेस निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित सोलापूर जिल्हा जलसंपदा आढावा बैठकीत जलसंपदामंत्री पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे ,आमदार समाधान अवताडे, सचिन कल्याणशेट्टी, , दीपक साळुंखे, जलसंपदा सचिव श्री. राजपूत, जलसंपदा चे मुख्य अभियंता श्री धुमाळ, अधीक्षक अभियंता भीमा कालवे मंडळ डी. ए. बागडे, अधीक्षक अभियंता श्री. साळे यांच्यासह जलसंपदा विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री पाटील पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यावर मोठे बॅरेजेस निर्माण करण्याचे प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर ९ बॅरेजेस निर्माण केले जाणार आहेत. प्रत्येक बॅरेजेस ची पाणी साठवण क्षमता ही जवळपास बारा टीएमसी इतकी असणार आहे. त्यामुळे या बॅरेजेस च्या लाभ क्षेत्रातील शेत जमीन सिंचनाखाली आल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जलसंपदा विभागाकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग तसेच धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला असता त्यावर बोलताना जलसंपदामंत्री श्री. पाटील म्हणाले की, जलसंपदा विभागामार्फत आउटसोर्सिंग द्वारे पुढील एक -दोन महिन्यात चौदा हजार अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत त्यामुळे राज्यात सर्वत्र जलसंपदा विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सिंचन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या घेण्यात आलेल्या जमिनीचा त्यांना योग्य मोबदला वेळेत मिळावा यासाठी जलसंपदा विभाग व महसूल विभागाच्या भूसंपादन शाखेनी एकत्रित येऊन शिबिराचे आयोजन करावे व संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करून त्यांना तात्काळ मोबदला देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देशही यावेळी श्री. पाटील यांनी दिले. तसेच असे शिबिर लवकर आयोजन करण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क ही साधला.
जिल्ह्यात जलसंपदा विभागामार्फत सुरू असलेली विविध सिंचन प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण तसेच प्रस्तावित करण्यात आलेली कामे मंजूर करून घेऊन तेही विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश पाटील यांनी देऊन जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. तसेच लोकपतिनिधींनी उपस्थित
केलेले मुद्दे व केलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून प्रतिवर्षी किमान तीस कोटी ची सिंचन पाणीपट्टी मिळणे अपेक्षित असताना फक्त प्रतिवर्षी १० कोटी रुपये शेतकऱ्याकडून भरले जातात. त्यामुळे प्रतिवर्षी वीस कोटीची थकबाकी राहते. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सिंचन पाणीपट्टी भरावी असे आवाहन जलसंपदा सचिव राजपूत यांनी केले. मुख्य अभियंता धुमाळ व अधीक्षक अभियंता बागडे यांनी ही जलसंपदा विभागामार्फत सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध उपसा सिंचन योजनांची माहिती बैठकीत सादर केली.
वाहून जाणारे पाणी अडविणे, शेतकऱ्याकडून संपूर्ण हंगामाची पाणीपट्टी ऐवजी वापरेल तेवढे पाण्यावर पाणी पट्टी वसुल करणे, जलसंपदा विभागातील अपुरे मनुष्यबळ व सोलापूर जिल्ह्यातील सिंचन क्षमतेत वाढ करण्याच्या अनुषंगाने विविध मागण्या करून त्या सोडवण्याबाबत मंत्रीमहोदयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
