उचंगी प्रकल्प पूर्ण व्हावा ही या परिसरातील शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची इच्छा आहे. परंतु; तो पूर्ण होऊ शकलेला नाही. दरम्यान; उचंगीच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन या वर्षी पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आमदार राजेश पाटील यांनी केले आहे. या प्रकल्पाची घळभरणी यावर्षी पूर्ण होण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी सहकार्य करण्याचे आवाहनही मंत्री श्री. मुश्रीफ व आमदार श्री. पाटील यांनी केले आहे.
वाटंगी ता. आजरा येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या मंत्री श्री. मुश्रीफ व आमदार श्री. पाटील यांनी या विषयावर भाष्य केले.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सोमवारी दि. १० उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची कोल्हापुरात बैठक होणार आहे. या बैठकीतही आम्ही प्रकल्पग्रस्तांना याबाबत विनंती करणार आहोत. कोणत्याही प्रकल्पासाठी शेतकऱ्याची जमीन संपादन हा शेतकऱ्याचा फार मोठा त्याग असतो. जमीन नव्हे, शेतकरी आपले काळीजच त्या प्रकल्पासाठी देत असतो. त्यासाठी योग्य मोबदलाही मिळणं गरजेचं असतं. दरम्यान, अनेक तांत्रिक अडचणीमुळे शासकीय कामात थोडा विलंब होतोय हेही खरं असतं. परंतु, या सगळ्या अडचणींवर मात करून यावर्षी पुनर्वसन करणारच, असा विश्वासही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या प्रकल्पाच्या पूर्ततेच्या निमित्ताने या भागातील शेतकऱ्यांचे गेल्या अनेक वर्षांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होईल. हरितक्रांतीचे हे स्वप्न सत्यात उतरेल, यासाठी प्रकल्पग्रस्तांनीही घळभरणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले.
