नाशिक. प्रतिनिधी २७
गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशात भ्रष्टाचार आणि करचोरीची अनेक प्रकरणं समोर आली आहे. आयटी आणि ईडीने केलेल्या कारवाईत अनेक मोठे मासे गळाला लागले आहेत.
उत्तर प्रदेशात एका अत्तर व्यावसायिकाकडे तब्बल 257 कोटींचं घबाड सापडल्याची घटना ताजी असताना, आता महाराष्ट्रात देखील आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आयकर विभागाने नाशिकसह धुळे आणि नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीत कोट्यवधी रुपयांचं घबाड आयटीच्या हाती लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाच्या छाप्यात संबंधित तीन जिल्ह्यातून 240 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.यामध्ये 6 कोटींच्या रोकडसह 5 कोटींचे मौल्यवान दागिने देखील जप्त केले आहे. उत्तर महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसात आयकर विभागाने तब्बल 31 ठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईत आयकर विभागाने 240 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे.
जमीन खरेदी विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार आणि बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाने छापेमारीत जप्त केलेलं कोट्यवधींचं घबाड मोजण्यासाठी तब्बल 12 तास लागले आहेत. छाप्यात सोन्याचे बिस्किट्स, मौल्यवान हिरे सापडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. छापेमारीत आढळलेली सर्व बेहिशोबी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली असून संशयित आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.
