मुंबई. प्रतिनिधी. १८.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने राज्यातील निर्बंध सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिथिल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
सर्व प्रकारची दुकाने, उपाहारगृहे, मॉलच्या वेळमर्यादेत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या सर्व व्यापारी दुकाने, बार, उपाहारगृहे, मॉल रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. उपाहारगृहांमध्ये एकूण क्षमतेच्या 50 टक्के इतक्याच ग्राहकांना प्रवेशास मुभा आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी व्यापारी तसेच उपाहारगृहांच्या मालकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान उपाहारगृहे व बारमालकांकडून वेळेची मर्यादा वाढवून देण्याची मागणी करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा, महाविद्यालये, चित्रपट तसेच नाटय़गृहे खुली करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.
दिवाळीपर्यंत खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता दुकाने, मॉलच्या वेळेतही वाढ करण्याबाबत सरकारच्या पातळीवर विचारविनिमय झाला.या पार्श्वभूमीवर दुकाने, उपाहारगृहे, मॉलवरील निर्बंध आता मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
