औरंगाबाद :- प्रतिनिधी.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे मंचावर असताना त्यांच्याकडे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या संदर्भात वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंचावर भाषण करण्यासाठी आले असता त्यांनी म्हटले, की ‘व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी’, असं म्हटलं.मुख्यमंत्र्यांनी हे विधान रावसाहेब दानवे यांच्या समोर तसेच त्यांच्याकडे पाहून केल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर जाहिरपणे हे वक्तव्य केल्याने आगामी काळात शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा होऊ लागली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले हे सूचक वक्तव्य आहे का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते.
👉दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात मला माजी मंत्री म्हणू नका, असे वक्तव्य केले होते.त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असतानाच आज मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना आणखीनच उधान आले आहे.
देहूतील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते, माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल असे म्हणत त्यांनी सूचक विधान केले होते.
