मॉन्सून अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात वाटचाल – हवामान विभागाने केले जाहीर
मुंबई :- प्रतिनिधी.
मागच्या काही दिवसांपासून स्थिरावलेल्या मॉन्सूनने गती घेतली आहे. मॉन्सून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाटचाल करताना, लक्षद्वीप बेटाच्या दक्षिणेकडील भागात हजेरी लावल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. यंदाच्या मोसमी हंगामात मॉन्सूनने वेळेआधी म्हणजेच १६ मे रोजी अंदमानात दाखल होत दणक्यात सुरुवात केली.
मॉन्सून केरळात देखील लवकर धडकण्याचे संकेत देण्यात आले. २६ मे रोजी मॉन्सून केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. या वेळी मॉन्सूनचे आगमान चार दिवसांची मागे-पुढे होण्याची तफावत गृहित धरण्यात आली होती. मात्र केरळातील मॉन्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा कायम आहे. यंदाच्या मोसमी हंगामात मॉन्सूनने अपेक्षेपेक्षा आधीच दमदार सुरुवात केली होती. १६ मे रोजी मॉन्सून अंदमान-निकोबार बेटांमध्ये दाखल झाला होता. सामान्यतः यापेक्षा काही दिवस उशिराने मॉन्सून अंदमानात पोहोचतो. त्यामुळे यंदा केरळातही मॉन्सून लवकर दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता. हवामान विभागाने २६ मे रोजी केरळ किनारपट्टीवर मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र मॉन्सूनच्या प्रवासात काही प्रमाणात मंदी आल्याने त्याचे केरळातील आगमन अद्याप झालेले नाही.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मॉन्सूनच्या आगमनात साधारण चार दिवसांची पुढे-मागे तफावत गृहित धरली जाते. त्यामळे पढील काही दिवसांत केरळात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता कायम आहे. दरम्यान, अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली अनुकूल हवामान परिस्थिती मॉन्सूनच्या प्रगतीस सहाय्यभूत ठरत आहे. समुद्रावरील वाऱ्यांचा वेग, आर्द्रतेचे प्रमाण आणि ढगांची निर्मिती यामध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण हवामान विभागाने नोंदवले आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील काही भागांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातही मॉन्सूनच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. केरळात मॉन्सून दाखल झाल्यानंतर साधारण आठ ते दहा दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचतो. त्यामुळे जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्यात मॉन्सूनच्या आगमनाची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा उष्णतेच्या तीव्र लाटांमुळे नागरिक हैराण झाले असून, शेतकरी वर्ग देखील पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने मॉन्सूनचे वेळेवर आगमन महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष केरळातील मॉन्सूनच्या अधिकृत आगमनाकडे लागले आहे.
