राज्यातील प्रलंबित २९ महापालिकांच्या निवडणुका.-
महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल १६ जानेवारी
मुंबई :- प्रतिनिधी.
राज्यातील प्रलंबित २९ महापालिकांच्या निवडणुकीचा
कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल १६ जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यातील २९ महापालिकांसाठी ३ कोटी ४८ लाख मतदार मतदान करणार आहेत.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील 29
महापालिकांच्या निवडणुका या गेल्या पाच ते सात वर्षांपासून किंवा त्या पेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देश पत्र स्वीकारण्याचा कालावधी हा 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 असणार आहे. या नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबर 2025 ला होणार आहे. उमेदवारी माघारीची मुदत ही 2 जानेवारी 2026 अशी असणार आहे. तर निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026 ला होईल. या महापालिकांसाठी मतदान 15 जानेवारी होईल. तर 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होईल”, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
